ठाणे : ठाणे शहरातील सॅटिस पुलाचे काम तसेच ठाणेकरवाडी येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मंगळवार सकाळी ९ वाजल्यापासून २४ तास शहरातील काही भागांत पाणीपुरवठा होणार नाही.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या रामनगर, चेंदणी कोळीवाडा, नातू परांजपे कॉलनी, सुभाषनगर, आनंद भारती मार्ग, कुंभारवाडा, सावरकरनगर, स्वामी समर्थ मठ परिसर, वाल्मीकी सोसायटी, श्रमदान सोसायटी, पत्रकार सोसायटी या भागांत मंगळवारी सकाळी ९ ते बुधवारी सकाळी ९ पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट करण्यात आले.