युरोप खंडात भारतीय हापूसवरील आणि आखाती देशात हिरव्या मिरच्यांवरील बंदी यामुळे फळे-अन्नधान्य व भाजीपाला यांच्यावर फवारल्या जाणाऱ्या औषधांचा मुद्दा ऐरणीवर आला. एकीकडे जाहिरातींमधून दाखविले जाणारे ‘प्रोसेसड् फूड’चे गाजर आणि दुसरीकडे ‘ऋतुमानास साजेशी’ फळे-भाज्या खाण्याचे आपले प्रयत्न यात आपण नेमके काय खातो, याचाच विसर पडू लागला आहे. धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपण अत्यल्प वेळेत खाता येतील आणि पचनसंस्थेवरही ताण पडणार नाही अशा पदार्थाची किंवा सर्वोत्तम म्हणून फलाहाराची निवड करतो; परंतु आपल्या सगळ्या तथाकथित समंजस आहारनिवडी शरीरास हितकारक असतात काय? धक्कादायक असले, तरी नेत्र विस्तारणाऱ्या खाद्यसत्याचा अंश..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गव्हाचा किंवा बहुधान्यीय ब्रेड
मैदा पचनास जड असल्यामुळे गव्हाच्या पावांचा पर्याय वारंवार निवडला जातो, पण त्यात ‘ब्लीचड्’ किंवा ‘रिफाइन्ड’ धान्य वापरले जाते. त्यातून पोषणमूल्ये तर मिळत नाहीतच, पण उलट त्यातील रासायनिक घटक मानवी शरीराला बाधक ठरू शकतात, असे काही संशोधनांमधून पुढे आले आहे. बहुधान्यीय पावाची गोष्टही वेगळी नाही. खाणे सोपे जावे तसेच तोंडात टाकताच पाव विरघळावा यासाठी त्यातील फायबर काढून टाकावे लागते.थोडक्यात, कमी उपद्रवी किंवा साधारण पोषक म्हणून निवडलेला पर्याय ‘उपद्रवी’च ठरत जातो.

जैवबदली भाजीपाला
उत्पादन वाढावे, शेती किफायतशीर व्हावी तसेच अधिकाधिक नफा मिळावा या हेतून जैवबदल प्रक्रिया केलेल्या कृषिपिकांचा पर्याय शोधला गेला. मग या जीएम अर्तात जैवबदल करण्यात आलेल्या अन्नपदार्थानी, भाज्यांनी तरी मानवी शरीराचे व्यवस्थित पोषण होते का? या प्रश्नाचे उत्तर शोधले असता, वेगळेच चित्र समोर येते. सोयाबीनमध्ये कर्करोगास प्रतिबंध करणारे आयसोफ्लेव्हॉन हे घटक असतात. मात्र या घटकांचे प्रमाण जैवबदल करण्यात आल्यानंतर प्रचंड घटते. अनेक तेलबियांमध्ये जीवनसत्त्व अ आणि ई मोठय़ा प्रमाणावर असतात. जैवबदल प्रक्रियेअंती हे प्रमाण घटलेले दिसते.
स्मरणशक्ती वाढविणारी, ताकद वाढविणारी, पचनास हलकी आणि पोषक अशा जाहिरातींचा साज चढवून आपल्यासमोर सध्या मोठय़ा प्रमाणात अन्नपदार्थ ‘मांडून’ ठेवले जात आहेत. मात्र या गोष्टींनी वाहवत न जाता त्यांच्यातील पोषणमूल्य, त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम, शरीराच्या गरजा अशा सर्व बाबींचा विचार करूनच आपण अन्नपदार्थाची निवड करावयास हवी. विशेषत: प्रोसेसिंग केलेल्या पदार्थाची खरेदी करताना अधिक चौकस आणि जागरूकतेने करावयास हवी.

इंजेक्शनी फळांची दुनिया
हिरवीगार भाजी, लाल टोमॅटो, पिवळे संत्रं पाहून आपले मन भुलते, पण वरच्या रंगांना भुलण्याचे कारण नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत किलगडे विकायला येताच त्यात आपण ते लाल आहे किंवा नाही हे थोडेसे कापून दाखवायला सांगतो. विक्रेताही लाल निघणार नाही अशी छातीठोक हमी घेऊन कुठलेही किलगड उचलतो आणि त्यात सुरा खुपसतो. आपल्याला लालबुंद असल्याची खात्री करून देतो, पण ते लालबुंद किलगड घरी आणल्यावर गोड मात्र लागत नाही, कारण मुळात ते पिकलेलेच नसते. उन्हाळ्यात जे उष्णतामान वाढते तेव्हा किलगड नसíगकरीत्या पिकते. मग विक्रेत्याचे प्रत्येक किलगड अगदी मार्च महिन्यातच कसे लालचुटूक असते, तर त्याला लाल रंगाचे इंजेक्शन बेमालूमपणे दिलेले असते. फळे व भाज्यांना कृत्रिम रंग देण्यासाठी सुदान रेड, मेथॅनॉल येलो व लेड क्रोमेट यांचा वापर केला जातो. द्राक्षे, पेर यांना अल्कोहोलचे इंजेक्शन दिले जाते, एका सिरिंजमध्ये एक औंस अल्कोहोल किंवा रंग बसतो.

कृत्रिम पद्धतीने पिकवलेली फळे कशी ओळखाल?
* कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांचा सुगंध नसíगक पद्धतीने पिकवलेल्या फळांसारखा नसतो. या आंब्याला सुरकुत्या नसतात. त्याची साल चमकदार दिसते म्हणून
आपण भुलतो.
* कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याच्या फळांची वरची साल पिकलेली दिसते, पण आत तो हिरवा असू शकतो.
* कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांना नसíगक पिकवलेल्या फळांपेक्षा कोरडेपणा असतो. रस अगदी कमी असतो.
* जर तुम्ही एखादा आंबा बघितलात आणि तो सर्व बाजूंनी सारखाच पिवळाधमक आहे असे दिसले तर तो कृत्रिमरीत्या पिकवलेला असण्याची शक्यता जास्त असते.
* आपण द्राक्षे, आंबे किंवा इतरही फळे नुसती पाण्याखाली धरल्यासारखे करतो अन् चिरायला घेतो. फळे व भाज्या मिठाच्या पाण्यात किंवा पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्यात धुऊन स्वच्छ करावीत व मगच त्यांचा वापर करावा, त्यामुळे त्यावरील कीटकनाशके निघून जातात. सफरचंदाला चमकवण्यासाठी मेण लावलेले असते.
* हंगाम नसताना कुठलीही फळे खरेदी केली तर ती कृत्रिमरीत्या पिकवलेली असण्याची शक्यता जास्त असते.
* आंबा खाताना प्रथम साल काढा व मग आंब्याचे तुकडे करा, मगच सेवन करा. आंबा एकदम अधाशासारखा खाऊ नका.
* कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे टाळण्यासाठी एप्रिलचा शेवट येईपर्यंत आंबे खरेदी करू नयेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ते खरेदी करावेत, कारण त्या वेळी आंब्याचा खरा हंगाम सुरू होतो. अलीकडे काही जण फेब्रुवारीतच आंबा बाजारात आणतात. त्यांना भुलू नका. (आधार- असोसिएशन ऑफ फूड सायन्टिस्ट्स टेक्नॉलॉजिस्टस- बंगळुरू)

आंबे, केळींमधील घातकता
१. कॅल्शियम कार्बाइडने फळे पिकवल्याने त्यात आस्रेनिक व फॉस्फरसचे अंश राहतात.
२. कर्करोगाची शक्यता- मेंदूचे रोग होऊ शकतात. त्यात जडपणा, संवेदनेत फरक जाणवतो. बाळंतपणात कॅल्शियम कार्बाइड पोटात गेल्यास बाळात विकृती संभवतात.
३. जे लोक फळे कॅल्शियम कार्बाइडने पिकवण्याचे काम करतात त्यांना चक्कर येणे, मूड बदलणे, गोंधळल्यासारखे होणे, स्मृती कमी होणे असे असंख्य आजार होऊ शकतात.

डाळी  आणि तांदूळ
तांदूळ आणि डाळी हा भारतीय अन्नातील अनिवार्य घटक, पण उत्तम पीक येण्याचा आग्रह, पीक तयार होण्यासाठी कमी काळ लागावा म्हणून त्याच्यावर फवारली जाणारी औषधे यांची परिणती त्यातील मूल्यांवर होते. तांदळांमध्ये असणारे अमिनो आम्ल तब्बल २५ ते ३० टक्क्य़ांनी घटते आहे. डाळींच्या सेवनामागील मुख्य हेतू हा प्रथिने मिळवणे असतो. मात्र, या प्रथिनांचे प्रमाणही तब्बल ३५ टक्क्य़ांनी कमी झालेले पाहावयास मिळते आहे. युरोप खंडात तर जैवबदल केलेल्या अन्नधान्याविषयी जनजागृती
करणारी अभियानेच राबविली जात आहेत.

फळे पिकतात कशी?
आंबे, सफरचंदे एकदम गोड होत नाहीत. ती पिकल्यानंतरच गोड लागतात. पिकण्यापूर्वी त्यांच्यात आम्ल असते, त्यामुळे पक्षी त्याला चोच मारीत नाहीत. फळातील बी परिपक्व झाले की मगच फळ परिपक्व होते. फळ पिकताना त्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत होते. त्यामुळे फळांचा रंग बदलून तो हिरव्याचा पिवळा किंवा लाल होतो, त्यामुळे पक्षी या फळांकडे लगेच आकर्षति होतात. त्यांनी गर खाल्ल्यानंतर बी मातीत पडते. आपण फळ खाल्ल्यानंतर बी कचऱ्यात जाते. आंब्यांचा हंगाम उन्हाळा, सफरचंदांचा हिवाळा हा असतो. हवामानातील आद्र्रता व तापमान यावरही पिकण्याची क्रिया अवलंबून असते. त्यामुळे आपोआप इथिलीन तयार होऊन तो झाडाभोवती पसरतो. इथिलीन फळापर्यंत पोहोचला की, फळाच्या पेशींना सूचना जाते. त्यामुळे फळांच्या पेशीत साखरेचे विघटन होते. त्यामुळे फळाच्या सालीतील रंगद्रव्ये बदलतात व ते पिकल्याचे दर्शवतात, अशा प्रकारे फळे नसíगकरीत्या पिकतात. आंब्याला अढी घातली की, ते पिकतात. पपई खाकी कागदात गुंडाळून ठेवली तर पिकते, पण लवकर पसा मिळवण्यासाठी आंबे फेब्रुवारीपासूनच बाजारात आल्याची आवई गेली काही वष्रे उठते आहे.

फळे कृत्रिमरीत्या कशी पिकवतात?
पिकलेली फळे फार काळ टिकत नाहीत म्हणून उत्पादक ती कृत्रिम पद्धतीने पिकवून ग्राहकांना विकतात. फायदा उद्योजकांचा, तोटा ग्राहकांचा होतो. फळातील इथिलीनमुळे फळे नसíगकरीत्या पिकतात हे आपण पाहिले, पण काही वेळा ती विकण्यासाठी कृत्रिमरीत्या पिकवली जातात. त्यासाठी आंबे किंवा केळी लाकडाच्या पेटय़ांमध्ये ठेवतात व त्याच्याखाली शेकोटी पेटवून चक्क इथिलीनची धुरी देतात. काही वेळा अ‍ॅसेटिलीनचा वापर करतात, त्यामुळे फळे पिकलेली दिसू लागतात.
दुसऱ्या पद्धतीत फळे एका खोलीत ठेवली जातात व तेथे इथिलीन किंवा असिटीलीन वायू सोडतात.
तिसरी पद्धत म्हणजे कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून फळे पिकवता येतात, फळांमध्ये त्याच्या पुडय़ा ठेवल्या जातात किंवा ते थेट फळांवर लावले जाते. त्यामुळे आद्र्रतेशी त्याची क्रिया होऊन, असिटीलिन वायू बनतो व फळे पिकतात. त्यांचा रंग आंबे व केळ्यांच्या बाबतीत पिवळाधमक दिसतो, पण ग्राहकांना मात्र धम्मक लाडू मिळतो. १ किलो कॅल्शियम कार्बाइड २५ ते ३० रुपयांना मिळते. ते १० टन फळे पिकवण्यास पुरेसे असते. मुळात कॅल्शियम कार्बाइड वेिल्डगच्या उद्योगात वापरतात. कॅल्शियम कार्बाइडच्या पुडय़ा बनवून त्या आंबे व केळ्यांच्या ढिगाऱ्यात एका खोलीमध्ये ठेवतात, त्यामुळे अ‍ॅसेटिलीन वायूमुळे फळे  पिकतात. केळी २४ ते ४८ तासांत पिकायला सुरुवात होते. फळे कृत्रिमरीत्या पिकल्यानंतर ती बर्फाच्या लादीवर ठेवतात. त्यामुळे त्यांचा रंग पिवळा, लाल अपेक्षित आहे तसा राहतो व ती ताजी दिसतात.

शरीरधोका
कॅल्शियम कार्बाइडने फळे पिकवल्याने यकृत व मूत्रिपडाला हानी होते. मेथॅनॉल यलोमुळे कर्करोग, पोटाचे विकार, पुनरुत्पादनाशी निगडित समस्या निर्माण होतात, लेड क्रोमेटमुळे पंडुरोग (अ‍ॅनिमिया), मेंदूची हानी व अंधत्व येते. सुदान रेड रंगामुळे पोटाचे व पचनाचे विकार होतात.
कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांचे धोके आहेत, पण नीट पारखून घेतली तर ती आपल्या वाटय़ाला ती येणार नाहीत याची काळजी घेता येईल. खरी काळजी उत्पादकांनी पशाची हाव बाजूला ठेवून घेतली पाहिजे.

कमी नुकसानकारक पद्धती
अढी लावून आंबे पिकवण्यात काहीच हानी नाही. तरी समजा आंबे लवकर पिकवायचे असतील तर ते ०.१ टक्के इथरेल ( १ लिटर पाण्यात १ मि.लि इथरेल) द्रावणातून भिजवून काढावेत व कोरडे करून वृत्तपत्राच्या कागदात गुंडाळून ठेवावेत किंवा जाडसर कापसात ठेवावेत. १० मि.लि एथरेल व २ ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साइड यांच्या गोळ्या करून त्या पाच लिटर पाण्यात टाकून ते भांडे फळे पिकवण्याच्या खोलीत ठेवा. फक्त खोली बंदिस्त हवी. यात फळे इथिलीन तयार झाल्याने १२ ते २४ तासांत पिकतात. इथिलीन वायूचे फवारे मारूनही २४-४८ तासांत फळे पिकवता येतात. कॅल्शियम कार्बाइडमुळे असेटिलीन वायू तयार होतो, तो मज्जासंस्थेस घातक असतो. म्हणून तशा पद्धतीने आंबे पिकवणे हानिकारक आहे.

भारतीय आंब्यातील फळमाशी
ब्रिटनने भारतीय हापूस आंब्यावर जी बंदी घातली त्याला फळमाशी हे एक कारण आहे. या कीटकामुळे आंबे आतून सडतात. फळमाशीतील मादी मीलनाच्या वेळी फेरोमोन हे संप्रेरक सोडते. त्याच्या वासाने नर तिच्याजवळ येतो, त्यामुळे या फळमाशीचे नियंत्रण करण्यासाठी फेरोमोनचे सापळे करून नरांना पकडले जाते. त्यामुळे फळमाशीचे नियंत्रण होते.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whats wrong with what we eat
First published on: 17-05-2014 at 01:01 IST