करोना व्हायरस महामारीच्या विरोधात लढण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी मिठाई आली आहे. या मिठाइचं नाव ‘इम्युनिटी संदेश’ असं आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच पश्चिम बंगाल सरकारकडून याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. गायीचे दूध, मध, हळद, तुळसी, केसर आणि वेलची यासारख्या १५ विविध गोष्टींची मिळून ही मिठाई तयार करण्यात आली आहे.

कोलकाता येथील मिठाई दुकानदार सुदीप मलिक म्हणाले की, “या मिठाईचं नाव ‘इम्युनिटी संदेश’ असं ठेवण्यात आलं असून १५ विविध गोष्टींपासून ही तयार करण्यात आली आहे. करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास या मिठाईचा उपयोग होऊ शकतो. या मिठाईमध्ये साखरेऐवजी हिमालयातू आणलेल्या मधाचा वापर केला आहे. ” अन्य एक दुकानदार बलराम मलिक म्हणाले की, ‘ ही मिठाई करोना व्हायरसचा अँटीडोट नाही. पण ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. ती वाढवण्याचं काम ही मिठाई करते.’

मिट्टी दोयी आणि रसगुल्लाप्रमाणेच संदेश मिठाई बंगालच्या परंपरागत मिठाई आहे. येथील दुकानदारांनी असा दावा केला आहे की, कोलकातासहत पश्चिम बंगालमध्ये वाढणाऱ्या करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी रोग प्रतिकारकशक्ती चांगली असावी लागते. ही रोग प्रतिकारकशक्ती या मिठाईतून वाढतेय. देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. महाराष्ट्र, बंगालसह सात राज्यात करोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे.