भारताच्या मानुषी छिल्लरने विश्वसुंदरीचा किताब पटकावल्यानंतर केलेल्या वादग्रस्त ट्विटबद्दल काँग्रेस नेते शशी थरूर यांनी जाहीर माफी मागितली आहे. मी केवळ मजेत तसे म्हटले होते. यामागे मानुषीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. शाब्दिक कोटी हा विनोदाचा प्राथमिक प्रकार आहे. द्विअर्थी शाब्दिक कोटी पण याचाच एक भाग आहे. मात्र, ज्यांना माझे ट्विट खरोखरच आक्षेपार्ह वाटले, त्या सर्वांची मी माफी मागतो. मात्र, मानुषीसारख्या उज्ज्वल भविष्य असणाऱ्या मुलीबाबत मला कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी करायची नव्हती. मी या अगोदरच तिचे कौतुक केले आहे. तेव्हा शांत व्हा, असे थरूर यांनी म्हटले.

मानुषी छिल्लरने १७ वर्षांनंतर भारतासाठी ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला. मात्र, शशी थरूर यांनी शाब्दिक कोटी करण्याच्या नादात अनावधानाने मानुषीच्या आडनावावरून तिची खिल्ली उडवली. छिल्लर हे आडनाव त्यांनी नोटाबंदीशी जोडले. ‘मोदी सरकारने आमच्या काळात सुरू असलेले चलन बंद केले. ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. आमच्या काळात असलेली चिल्लरही आता मिस वर्ल्ड झाली’ या आशयाचे ट्विट शशी थरूर यांनी केले होते.

‘त्या’ उत्तरामुळे मानुषी छिल्लर झाली मिस वर्ल्ड

त्यानंतर ट्विटरकरांनी शशी थरूर यांच्यावर टीका केली होती. मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला आहे. तिची अशा प्रकारे खिल्ली उडवणे चूक आहे. तुम्हाला हे वर्तन शोभत नाही, असे काही नेटकऱ्यांनी त्यांना सुनावले. एका ट्विटर युजरने शशी थरूर यांची तुलना राहुल गांधींसोबत केली आहे. राहुल गांधी आणि शशी थरूर यांनी एकमेकांच्या ट्विटर अकाऊंटची अदलाबदल केली आहे, असे वाटत असल्याचे त्याने म्हटले.

‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’