इंडियन फॉरेस्ट सर्विसमधील आधिकारी प्रवीण कासवान यांनी ट्विटरवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 11 नोव्हेंबर रोजी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला एका दिवसात दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कासवान यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हत्ती महामार्ग ओलांडत असल्याने ट्रक चालकाने ट्रक थांबवल्याचे दिसत आहे. ट्रक चालक हत्ती रस्ता ओलांडून पलीकडे जाईल याची वाट पाहत उभा असतानाच हत्ती या ट्रकच्या दिशेने येतो. त्यावेळी ट्रक चालकाच्या बाजूला असणाऱ्या खिडकीतून हत्ती सोंड आत घालून ट्रकमधील खाद्यपादर्थ सोंडे उचलताना दिसतो. ट्रक चालकाबरोबर बसलेली व्यक्तीही या हत्तीने अचानकपणे सोंड ट्रकमध्ये घातल्याचे पाहून त्याला सोंडेमध्ये केळ्यांचा घड देते. त्यानंतरही हत्ती आणखीन काही केळी सोंडेत घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र सोंड बाहेर काढताना तो चालकाच्या मानेभोवती सोंड गुंडळतो. चालक प्रसंगावधान दाखवून स्वत:ची सुटका करुन घेतो आणि तेथून ट्रक पळवतो. हत्ती काही काळ आणखीन केळ्यांसाठी ट्रकच्या मागे धावतानाही व्हिडीओत दिसतो. Daylight robbery on a highway. A forward. pic.twitter.com/QqGfa90gF5 — Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) November 11, 2020 कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर करताना, "हायवेवर दिवसाढवळ्या झालेली चोरी," अशी मजेदार कॅप्शन दिली आहे. "खरं सांगायचं तर याच कारणामुळे जंगलामध्ये जंगली प्राण्यांना खाद्य पदार्थ देऊ नका अशा पाट्या लावलेल्या आढळतात. त्यांना या नव्या चवींची सवय होऊन जाते. त्यामुळेच हे प्राणी रस्त्यावर आणि माणसांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतात. दूरदृष्टीने विचार करता हे प्राण्यांसाठी फायद्याचे नाहीय. अर्थात हे म्हणणं या व्हिडीओसाठी नाहीय," असंही कासवान यांनी म्हटलं आहे. On a serious note this is why you see ‘Do not feed wild animals’ board near forest area. They become habitual of new taste. And keep coming to road & near human. This is not helpful to them in long run. Though possibly this is not related with this video. — Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) November 11, 2020 या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी समिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. चालक सुरक्षित असल्याबद्दल एकाने देवाचे आभार मानलेत. तर काहींनी कासवान यांनी केलेल्या वक्तव्यावर आपले मत मांडताना प्रत्येक प्राण्याला खाद्य पदार्थ मिळवण्याचा मानवाइतकाच हक्क असून आपण प्राण्यांना शक्य असेल तेव्हा खायला दिलं पाहिजे असं म्हटलं आहे.