कधीकधी एखादा फोटोही हजार शब्द सांगू शकत नाही अशा भावना व्यक्त करुन जातो. नुकताच असा एक फोटो व्हायरल झाला आहे. राजस्थानमध्ये हिंसाचार सुरु असताना आपल्या छातीशी बाळाला धरुन धावणाऱ्या कॉन्स्टेबलचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी चारही बाजूला आग दिसत आहेत. कॉन्स्टेबलने आपला जीव धोक्यात घालत चिमुरड्यासहित तीन लोकांना हिंसाचारामुळे भडकलेल्या आगीपासून वाचवलं. हा फोटो पाहून प्रत्येकजण कॉन्स्टेबलच्या धाडसाचं कौतुक करत आहे. झालं असं की, राजस्थानच्या करौलीमध्ये हिंदू संघटनांनी नव संवत्सरच्या निमित्ताने बाईक रॅली काढली होती. मुस्लीमबहुल भागातून जात असताना या बाईक रॅलीवर काही समाजकंठकांनी दगडफेक केली. यानंतर तिथे हिंसाचारास सुरुवात झाली. या हिंसाचारात जाळपोळ करत एकमेकांचा जीव घेण्याचा प्रयत्न सुरु असताना एक कॉन्स्टेबल मात्र चिमुरड्यासबित कुटुंबाला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालत होता. त्याचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नेत्रेश शर्मा यांनी चिमुरड्यासहित तीन लोकांचा जीव वाचवला. शामलीच्या एसएसपी सुक्रिती माधव मिश्रा यांनी हा फोटो ट्वीट करत आपल्याला नेत्रेश यांचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीदेखील नेत्रेश यांचं फोन करत कौतुक केलं आहे. तसंच त्यांना बढती देत या धाडसाचं बक्षीसही दिलं. नेमकं काय झालं? राजस्थानच्या करौलीमध्ये हिंसाचार सुरु होता. काही समाजकंठकांनी दुकानं जाळली. यावेळी सगळीकडे आग लागली होती. एका दुकानात एक चिमुरडा आणि दोन महिला अडकल्या होत्या. या दोन महिला आणि त्यांच्या हातात असणारं बाळ ते दृश्य पाहून घाबरलं होतं. तेव्हाच नेत्रेश यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. यावेळी त्यांनी बाळाला महिलेकडचा दुपट्टा घेऊन झाकलं आणि आपल्या छातीशी धरत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. नेत्रेश आगीचे लोट उठत असताना मुलाला घेऊन धावतानाचा फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि लोकांनी त्यांचं कौतुक करण्यास सुरुवात केली. नेत्रेश २०१३ मध्ये कॉन्स्टेबल पदावर पोलिसात भरती झाले होते. सध्या ते करौली शहर पोलीस ठाण्यात तैनात आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांना हेड कॉन्स्टेबल पदावर बढती दिली आहे.