आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील एखादी जवळची व्यक्ती गेली की आपल्याला होणारं दु:ख हे शब्दांत न सांगता येणारं आहे. त्या व्यक्तीला निरोप देताना डोळे भरुन येतात. भविष्यात ही व्यक्ती आपल्याला कधीच दिसणार नाही हे दु:ख सारखं मनाला बोचत राहतं. पण तुम्ही कधी आपल्या जवळच्या व्यक्तीला हसत खेळत, नाच गाण्यांच्या जल्लोषात शेवटाचा निरोप देताना पहिलंत का? मग तर तुम्ही घानामधल्या लोकांविषयी वाचलंच पाहिलं. एखादी व्यक्ती आपल्यातून गेली की त्याचा शोक करत बसण्यापेक्षा ते जल्लोषात त्या व्यक्तीला निरोप देतात. त्यांच्यासाठी अंत्ययात्रा म्हणजे एक सेलिब्रेशनचं असतं.

अनेकदा कुटुंबिय मृत व्यक्तीची शवपेटी आकर्षक पद्धतीने तयार करून घेतात. पारंपरिक शवपेटीपेक्षा वेगवेगळ्या आकाराच्या शवपेट्या तयार करून घेण्यावर त्यांचा भर असतो. अंत्ययात्रा निघताना कुटुंबिय नातेवाईक इतर मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. पण यावेळी कोणाच्याही चेहऱ्यावर दु:ख नसते, ना डोळ्यात अश्रू असतात. चेहऱ्यावर फक्त आनंद असतो. पारंपरिक वाद्यं आणि संगीत यांच्या तालावर ठेका धरत अंत्ययात्रेत सगळेच डान्स करतात. खाणं पिणं, गाणं, नृत्य अशा जल्लोषात अंत्ययात्रा निघते.

‘सीएनएन’ने दिलेल्या माहितीनुसार तर हे लोक अंत्ययात्रेवर लग्नापेक्षाही कैक पटींनी जास्त पैसे खर्च करतात. आपल्याकडे वेडिंग प्लानर प्रकार असतो. तसेच तिथे खास अंत्ययात्रा प्लान करणाऱ्या एजन्सी देखील आहेत. यात वादक, गायकापासून डान्सर देखील आहे. यातले काही जण तर शवपेट्या खांद्यावर ठेवून संपूर्ण अंत्ययात्रेत न थकता नाचूही शकतात. तेव्हा कुठेही पाहायला मिळणार नाही अशी आगळीवेगळी अंत्ययात्रा तिथे पाहायला मिळते. जन्मापेक्षाही मृत्यूचा जल्लोष इथे अधिक असतो. हल्ली इथले अनेक लोक याच पावलावर पाऊल ठेवून पाण्यासारखा पैसा अंत्ययात्रेवर खर्च करतात तेव्हा त्यांच्या अशा वागण्यावर इथलं सरकारही काळजी व्यक्त करत आहेत.