‘पप्पा आता यापुढे राडय़ाला संघर्ष म्हणायचे ना!’ कानावर अचानक आदळलेल्या या प्रश्नाने त्यांच्या विचाराची तंद्री भंगली. डोळे मोठे करत मुलाकडे बघितल्याबरोबर तो खोलीच्या बाहेर सटकला. मग पुन्हा ते विचारमग्न झाले. मानलं बुवा या दिल्लीच्या चाणक्याला. आपल्या राजकीय चढउताराचे काय यथार्थ वर्णन केले त्यांनी. तेही अगदी मोजक्या शब्दात. नाहीतर आधी पक्ष बदलला की उगीचच आपण कानकोंडी व्हायचो. लोक जेव्हा सत्तेसाठी लाचार अशी टीका करायचे तेव्हा छातीत कळ उठायची. ते सारे पक्षबदल अन्यायातून झाले होते अशी अप्रत्यक्ष कबुलीच दिली की या भरईनी! आपले नेतृत्व सुद्धा अन्यायातून उभे झाले आहे असेही ते बोलून गेले. माझ्यावर टीका करणाऱ्या राज्यातील नेत्यांनो, राजकीय भाष्य व निरीक्षण कसे असते ते शिका या भाईंकडून जरा. माझे आजवरचे पक्षत्याग निव्वळ पदासाठी नव्हतेच मुळी! अपमान व अन्याय कधीच सहन करायचा नाही हे मी चेंबूरमध्येच शिकलो. तसाही अस्सल कोकणी कधीच हे सहन करत नाही. संधीची दीर्घकाळ वाट पाहात बसणे माझ्या स्वभावातच नाही. म्हणून तर फटाफट पक्ष सोडत गेलो. या पक्षात आल्यावर तरी राज्य ‘सेवे’ची संधी मिळेल असे वाटत असतानाच अचानक दिल्लीवारी घडली. हे घडले तेव्हा सवयीप्रमाणे स्वभावातली बंडखोरी उफाळून आलीच होती पण मग स्वत:च स्वत:ला शांत केले. आधीच्या पक्षात असताना केलेली वारंवार बोलण्याची चूक पुन्हा करायची नाही असे स्वत:ला बजावले. ‘चाणक्यमंडळात जाऊन झाला शांत’ अशा शब्दात काहींनी हिणवले तरीही तोल ढळू दिला नाही. शेवटी मिळाले एकदाचे तपश्चर्येचे फळ. आता सन्मान पक्का. फक्त तो राज्याच्या राजकारणातला हवा. दिल्ली नकोच. तिथे थंडीने घसाच बसतो. एकदा का हा सन्मान मिळाला की एकेकाचे हिशेबच चुकते करायचे आहेत. कोंबडीचोर म्हणतात काय? आता दाखवून द्यायची वेळ जवळ आली आहे. अहो, साधा पोटनिवडणुकीतला पराभव तो. तरीही तो झाल्याबरोबर माझ्या घरासमोर कोंबडय़ा आणून सोडल्या. रक्त तर असे उसळले होते तेव्हा पण तत्कालीन पक्षाच्या संस्कृतीकडे बघून गप्प बसलो. अरे, तेव्हा हरीला सोबत घेत जे राडे (नाही संघर्ष) केले ते पक्षासाठीच होते ना! तसे केले नसते तर आज पक्षाला हे दिवस बघायला मिळाले नसते. उठवळ लोकांच्या लक्षात हे कसे येणार म्हणा? राज्याचे नेतृत्व केले त्याला आता २२ वर्षे होत आली. मधल्या काळात साकवाखालून बरेच पाणी वाहून गेले. मध्ये मंत्रीपदही मिळाले पण त्या कामात काही राम नव्हता. किमान आतातरी नेतृत्वाची संधी मिळायला हवी. येथेही इच्छुकांची रांग मोठीच आहे पण भाईंचा शब्द प्रमाण असतो. त्यामुळे त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायला हवा. तसेही सध्या पक्षात बहुजनांची वानवा आहे. त्यामुळेच सन्मानाची संधी प्रबळ झालेली दिसते. कर्तृत्ववानाचे पाय खेचण्याची संस्कृती साऱ्याच पक्षात रुजली आहे. म्हणून तर आपल्याला इतकी घरे बदलावी लागली. येथे तसे होणार नाही असेच संकेत आता मिळाले. चला, चांगले दिवस येऊ लागले आता! विचार करता करता त्यांनी खिशातून कंगवा काढला. केस विंचरून नीट केले. तेवढय़ात त्यांना दोन्ही मुलांची आठवण झाली. या दोघांनाही बोलावून आता समज द्यायला हवी. निदान सन्मान मिळेपर्यंत तरी राडा नको व संघर्षही नको. काय करणार? शेवटी आपले रक्त ना! त्यामुळे वेळोवेळी वेसण तर घालावीच लागणार!