निविदाच न निघाल्यामुळे कामाला विलंब
वसई: भाईंदर आणि वसईला जोडणाऱ्या भाईंदर खाडीपुलाच्या कामाला आणखी विलंब लागण्याची शक्यता आहे. या पुलाच्या कामाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले असून परवानग्या मिळाल्या आहेत मात्र अद्याप निविदा प्रक्रियेचे काम सुरू न झाल्यामुळे पुलाचे काम लांबणीवर पडणार आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च आणखी काही कोटींनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वसई-विरार शहराला मुंबईशी जोडणाऱ्या भाईंदर खाडीवर एमएमआरडीएतर्फे सहा पदरी पूल बांधला जाणार आहे. २०१३ मध्ये या कामाला अंतिम मंजुरी मिळाली होती. हा पूल कांदळवन वनक्षेत्र आणि खारभूमीच्या मिठागरातून जाणार आहे. या कामासाठी एमएमआरडीएने ‘मुंबई सागरी मंडळ’ (एमएमबी), ‘इनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडिया’ (आयडब्ल्यूएआय) आणि ‘महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) च्या परवानग्या मिळवल्या आहेत. एप्रिल महिन्यात खारभूमी विभागाने ९.८६ हेक्टर जागा देण्यास संमती दर्शवली होती. त्यामुळे पुलाच्या कामाचा अडथळा दूर झाला होता. त्यानंतर एमएमआरडीएने खारभूमी विभागाला या जागेच्या मोबदल्यात ३२ कोटी ४३ लाख रुपये देण्याचे मंजूर केले आहे. मात्र ही प्रक्रिया संथगतीने सुरू असल्याने प्रत्यक्ष कामाच्या निविदा निघालेल्या नाहीत. हे काम संथगतीने होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत एमएमआरडीएच्या जनसंपर्क विभागाकडून माहिती उपलब्ध होऊ शकली नाही तर एमएमआरडीएचे प्रकल्पसहसंचालक भोसले यांनी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद दिला नाही.
खर्च वाढणार
या पुलाचे काम सप्टेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे यापूर्वीच एमएमआरडीएने सांगितले होते. वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर आणि एमएमआरडीएचे माजी सदस्य नारायण मानकर यांनी या पूलाचे काम संथगतीने होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नवघर माणिकपूर नगरपरिषद असताना या खाडी पुलाचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे ठेवण्यात आला होता. तेव्हा पूलाचा खर्च ३०० कोटी होता. २०१८ पर्यंत तो अकराशे कोटींवर पोहोचला. अखेर २०१३ मध्ये एमएमआरडीएने या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती.त्यामुळे पूलाचा खर्च आता १५०० कोटींवर पोहोचला होता. सप्टेंबर २०२४ पर्यंतचे लक्ष्य गृहीत धरून हे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता पूलाचे काम आणखी लांबणीवर पडल्याने खर्च आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे.