आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण, बेघर होण्याच्या भीतीने रहिवासी धास्तावले वसई : वसई पूर्वेच्या राखीव जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या ४१ निवासी इमारतींना खाली करण्याच्या नोटिसा पालिकेने बजावल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. मागील १२ वर्षांपासून या इमारती या जागेवर उभ्या आहेत. बिल्डरांनी फसवून घरे विकल्याने या रहिवाशांच्या डोक्यावर आता कारवाईची टांगती तलवार आली आहे. वसई पूर्वेच्या मौजे आचोळे येथे भूमापन क्रमांक २२, २३, २६, २७, २८, २९ व ३० येथील जागा सांडपाणी प्रकल्पा (एसटीपी प्लान्ट) आणि कचरा भूमी (डम्पिंग ग्राऊंड) साठी आरक्षित आहेत. यापैकी काही जागा खासगी मालकीच्या तर इतर जागा या पालिका आणि महसूल विभागाच्या आहेत. मात्र या जागेवर अतिक्रमण होऊन अनेक निवासी इमारती बांधण्यात आल्या होत्या. मागील १२ वर्षांपासून या जागेवर या इमारती सुरू आहेत. पालिकेने आता येथील ४१ निवासी इमारतींना खाली करण्याच्या नोटिसा बजावल्याने रहिवासी धास्तावले आहेत. आम्हाला बिल्डरांनी फसवून घरे विकली आणि ते निघून गेले पण आता आम्ही जायचे कुठे? असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे. भाजपाने पालिकेच्या या कारवाईबद्दल तीव्र संताप व्यक्त केली आहे. मागील १२ वर्षांपासून या इमारती उभ्या आहेत. या ठिकाणी अनधिकृत बांधकामे होत असताना पालिका प्रशासन झोपले होते का असा सवाल भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष मनोज बारोट यांनी केले आहे. ज्या भूमाफियांनी आणि बिल्डरांनी या अनधिकृत इमारती बांधून रहिवाशांची फसवणूक केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून या इमारतीमधील रहिवाशांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे पालिका आपल्या कारवाईवर ठाम आहे. आम्ही अचानक नोटिसा दिलेल्या नसून यापूर्वीदेखील कारवाई केली होती, असे प्रभाग समिती ‘ड’ चे प्रभारी साहाय्यक आयुक्त रतेश किणी यांनी सांगितले. यापूर्वी आम्ही या परिसरातील शंभरहून अधिक इमारती तोडल्या होत्या. विभागीय कोकण आयुक्तांकडे तक्रारी आल्यानंतर पुन्हा आम्ही कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. बिल्डरांनादेखील महाराष्ट्र प्रांतिक अधिनियमाअंतर्गत (एमआरटीपी) नोटीस बजावल्या आहेत असे त्यांनी सांगितले. आरक्षित जागांवर अतिक्रमणांमुळे पालिकेपुढे पेच शहरातील विविध विकासकामांसाठी असलेल्या आरक्षित जागेवर अतिक्रमण झाल्याने पालिकेपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. वसई पूर्वेला गोखिवरे येथे पालिकेची कचराभूमी आहे. त्याची क्षमता संपली आहे. तेथे कचर्म्याचे डोंगर उभे राहिले आहेत. शहरातल ९ सांडपाणी प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र जागेअभावी केवळ एकच प्रकल्प सुरू आहे.