रुग्ण व कर्मचारी यांची गैरसोय ; पालिकेकडून पाणी पुरवठा करण्याची मागणी वसई : विरार पूर्वेच्या चंदनसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी येणारे रुग्ण व कामकाज पाहण्यासाठी असलेले कर्मचारी यांची गैरसोय होऊ लागली आहे. विरार पूर्वेतील चंदनसार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रा मार्फत आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा दिली जात आहे. मात्र सद्यस्थितीत या आरोग्य केंद्रात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी पिण्यासाठी व इतर वापरासाठी पाणीच नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे केंद्र पालिकेच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने पालिकेकडून या ठिकाणी पाणी पुरवठा मिळणे गरजेचे आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून योग्य रित्या पाणी पुरवठा होत नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. दररोज विविध प्रकारच्या तपासणी, तसेच सलाईन , तर आता काही नागरिक लसीकरण करवून घेण्यासाठी येत असतात. तर जवळपास १२ अधिकारी व कर्मचारी येथे कार्यरत आहेत. त्यांना वापरासाठीही पाणी मिळत नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे. आरोग्य केंद्राला पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिकेच्या पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने अजूनही पाणी मिळाले नाही. पालिकेने रुग्णांची व याठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचारी यांची गैरसोय लक्षात घेता पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी येथील कर्मचारी यांनी केली आहे. आरोग्य केंद्रात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा याबाबत पालिकेकडेही पत्रव्यवहार केला आहे. परंतु अजूनही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे रुग्ण व येथील कर्मचारी यांचे पाण्याविना हाल होत आहेत. यासाठी पालिकेने या केंद्राला लवकरात लवकर पाणी पुरवठा करावा अशी आमची मागणी आहे. — डॉ. बाळासाहेब जाधव, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनसार