विरार : महाराष्ट्र राज्य नदी संवर्धन अभियानात सामील नालासोपारा परिसरात असलेल्या पेल्हार नदीचा विकास अजूनही कागदावर उभा आहे. सन २०१९ मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य शासनाला अहवाल सादर केला होता. यात मंडळाने नदीचे मूळ पात्रच गायब केले होते. यातही अजूनही सुधारणा केली नाही. तर नदी संवर्धनासाठी पालिकेने आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अजूनही या संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही.महाराष्ट्र शासनाच्या नदी स्वच्छ योजनते महाराष्ट्रातील इतर नद्यांमध्ये वसई विरारमधील पेल्हार नदीचा समावेश करण्यात आला आहे. पण या नदीचे दुर्दैव असे की स्थानिक प्रशासनाकडून या नदीचे संवर्धन करण्यात आलेच नाही. अनेक वर्षांपासून या नदीवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण सुरू आहे. त्याच बरोबर मोठय़ा प्रमाणात या परिसरात असलेले शेकडो अनधिकृत तबेले, कारखाने आणि औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीच्या पात्रात सोडले जाते. यामुळे या नदीचे पात्र मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाले आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात याचा मोठा परिणाम झाला. परिसरातील सर्व पाणवठे दुषित झाले आहे. शेकडो एकर शेती नापीक झाली आहे. त्याचबरोबर वनक्षेत्रावरही याचा मोठा परिणाम झाला आहे.पेल्हार नदी ही सोपारा खाडीतून विसर्ग होऊन पुढे वसईच्या खाडीत जाते. असे असतानाही प्रदूषण मंडळाच्या अहवालात ही नदी पेल्हार धरणातून सुरू होऊन वसईच्या गोलाणी नाक्यापर्यंत संपते. आणि केवळ ९ किमीचे पात्र प्रदूषित असल्याचे या अहवालात म्हटले आहे. त्यातही प्रदूषित करणारे नाले हे गोलाणी नाक्याच्या पुढे आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आणि वसई विरार महानगर पालिकेने शासनाला सादर केलेल्या अहवालात पेल्हार नदीचे पात्र कमी दाखवले आहे. आणि या नदीला प्रदूषित करणारे नाले सोपारा नाला, तुंगार नाला, वालीव नाला हे नाले गोलाणी नाक्याच्या कितीतरी पुढे आहेत. त्यात सोपारा फाटय़ावरील नाल्यातून ०.५७ एम एल डी सांडपाणी या नदीत जात आहे, तुंगार नाल्यातून ०.२ एम एल डी सांडपाणी तर वालीव नाल्यातून ०.१२ एम एल डी पाणी या नदीच्या पात्रात जावून नदी प्रदूषित केल्याचे म्हटले आहे.अहवाल २०१९ मध्ये शासनाकडे सुपूर्दहा अहवाल २०१९ मध्ये शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी पालिकेने या प्रदूषित नदीला स्वच्छ करण्यासाठी पालिकेने दोन वर्षांत या नदीच्या पत्रावर सांडपाणी प्रक्रिया योजना, तसेच येथील तबले आणि अनधिकृतपणे झालेले अतिक्रमण तोडण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र ४ वर्षे उलटूनही पालिकेने या योजनेकडे ढुंकूनही पहिले नाही. या परिसरात असलेल्या एकही कारखाने किंवा औद्योगिक वसाहतीकडे सामान्य सांडपाणी प्रक्रिया संयंत्र बसविलेले नाही. या अहवालात दिलेल्या माहितीनुसार या परिसरात साधारणत: १५० तबेले असून त्यात २५ ते ३० हजार जनावर आहेत. या तबेल्यातील मलमूत्र या पाण्यात सोडले जाते. यामुळे या नदीला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.