Mumbai Dahisar Toll Plaza वसई: मुंबईच्या वेशीवर असलेला दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या होत्या. त्यानुसार रविवारपासून त्याचे स्थलांतर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हा नेमका पथकर नाका कुठे स्थलांतरीत होईल याबाबत अजूनही अस्पष्टता आहे.
मिरा भाईंदरमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईच्या वेशीवर असलेला दहिसर पथकर नाका स्थलांतर करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ८ नोव्हेंबर रोजी पथकर नाका स्थलांतरीत होईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शनिवारी जागेची पाहणी करण्यासाठी वसईतील ससूनवघर येथे दाखल झाले होते. पण, स्थानिकांनी केलेला विरोध आणि घोषणाबाजी यामुळे मंत्री सरनाईकांना पाहणी न करताच माघारी परतावे लागले होते.
वसईत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले कि, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या विनंतीवरून हा पथकर नाका हटवण्याचे निर्देश दिले होते. राज्याचा एक जबाबदार मंत्री म्हणून पथकर नाका स्थलांतरित करायचा हा निर्णय मी घेतला. पण, आता पथकर नाका कुठे असावा हि त्या ठेकेदाराची आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (MSRDC) जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर, कोणत्याही परिस्थितीत दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्यात येईल, अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली होती. त्यानुसार, रविवारची मध्यरात्रीपासून दहिसर पथकर नाका स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाला आहेत.
पथकर नाक्याच्या जागेचा संभ्रम कायम…
दहिसर पथकर नाका स्थलांतरीत करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १३ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानुसार ठेकेदाराने दहिसर पथकर नाका तोडण्याचे काम सुरू केले आहे. रविवार मध्यरात्रीपासूनच या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पण, पथकर नाका स्थलांतराची जागा निश्चित नसल्यामुळे जागेबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.
