वसई: वाढत्या उन्हाच्या उष्णतेमुळे झाडे ही सुकून जात आहेत. या झाडांना संजीवनी मिळावी यासाठी सनसिटी येथे नन्हे फाऊंडेशनच्या तरुणांनी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्यास सुरवात केली आहे. झाडांना बाटल्या बांधून सलाईनद्वारे पाणी पुरविले जात आहे.

वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरात सामाजिक संस्था व लोकसहभागातून मागील तीन वर्षात पाच ते सहा हजार झाडांची लागवड केली आहे. मात्र  सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे जमिनीतील पाण्याची आद्रता कमी होत आहे. जास्त काळ झाडांच्या मुळाशी ओलावा नसल्याने हळूहळू ही झाडे सुकून जात होती. ही झाडे सुकू नये यासाठी यासाठी वसईतील काही होतकरू तरुणांनी पुढाकार घेत आगळी वेगळा शक्कल लढवत झाडांचे प्राण वाचविण्यासाठी अनोखा प्रयोग केला आहे.

शीतपेयाच्या रिकामी झालेल्या दोन लीटरच्या बाटल्या गोळा करून त्याला छिद्र पाडून झाडांना लावण्यात आल्या आहेत. सलाईनच्या मार्फत प्रवाह नियंत्रित करून या झाडांना पाणी दिले जात आहे. यामुळे भर उन्हाळ्यात सुद्धा या झाडांना पाणी मिळत असल्याने झाडांच्या मुळाशी ओलावा टिकून राहत आहे.सकाळी प्रभात फेरीसाठी येणारे नागरिक ही त्यात पाणी टाकत आहेत. तसेच दररोज ज्या बाटल्या मधील पाणी कमी होत आहे ते सुद्धा संस्थेचे सदस्य भरत आहेत.आतापर्यंत दीडशे ते दोनशे बाटल्या झाडांना लावण्यात आल्या आहेत. अजून पाचशे बाटल्यांचे नियोजन करण्यात आले आहे असे नन्हे फाऊंडेशनचे संजय वैष्णव यांनी सांगितले आहे.

बाटल्यांचा पुनर्वापर

प्लास्टिकच्या बाटल्या शीतपेय व पाणी वैगरे पिऊन झाल्यानंतर फेकून दिल्या जातात. त्याच बाटल्याचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने या बाटल्या घेऊन त्या योग्य पद्धतीने कापून त्या ठिबक सिंचनासाठी तयार केल्या जात आहे.यामुळे एकप्रकारे पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने ही मदत होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळ झाडांच्या मुळाशी ओलावा टिकून राहावा यासाठी ठिबक सिंचन करण्याचा प्रयोग आम्ही केला आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. – संजय वैष्णव, नन्हे फाऊंडेशन सदस्य