विरार : वसई-विरार महानगर पालिकेने शहरातील रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पावसाळय़ात रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने उशिरा का होईना पालिकेने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. संपूर्ण रस्ते खराब असताना पालिका मात्र रस्त्यावर ठिगळ लावण्याचे प्रकार करत आहे. शहरातील रस्त्यांना ठिगळ लावण्याचे काम मोठय़ा वेगाने सुरू आहे. पावसाळय़ात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यात पालिकेने पावसाळय़ात खडी भरण्याचा प्रकार केला होता. पण पावसामुळे ही खाडी वाहून जाऊन खड्डय़ांचे आकार मोठे होत गेले. आता पाऊस थांबल्यानंतर पालिकेने शहरातील सर्वच रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. पण रस्ते दुरुस्ती करताना केवळ खड्डे भरले जात आहेत. या खड्डय़ात डांबरीकरण करून रस्ते दुरुस्त केले जात आहेत. यामुळे रस्त्यांवर उंचवटे निर्माण होऊन वाहन धारकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी ठिगळ लावले असल्याने रस्ते अधिक धोकादायक झाले आहेत. त्यातही पालिकेने केवळ मोठय़ा खड्डय़ांना प्राधान्य दिले आहे. यामुळे रस्त्याच्या इतर भागांत अजूनही छोटे छोटे खड्डे त्रासदायक ठरत आहेत. गतिरोधक रंगवण्याचे काम हाती न घेतल्यामुळे चालकांना त्याचा पटकन अंदाज येत नसल्याने अपघातांच्या घटना घडतात. सध्या रस्ते दुरुस्तीचे काम सुरु आहे शहरातील गतिरोधक दुरुस्तीचीही मोहीम सुरु आहे. लवकरच त्यावर पट्टे सुद्धा मारले जातील. अनेक ठिकाणी नको असलेले गतिरोधक काढले जातील’’ - राजेंद्र लाड, मुख्य शहर अभियंता , वसई-विरार पालिका