दक्षिणेतील ओणमपासून सण-समारंभाच्या हंगामाला सुरुवात होत असल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव म्हणजे आनंदोत्सवच. राहत्या घरातील वातावरण मंगलमूर्तीच्या आगमनाने प्रसन्न तर होतेच. शिवाय हा मुहूर्त साधूनही घरखरेदीचा अनेकांचा कल असतो. यासाठी आता विकासकही सज्ज झाले आहेत.

गणरायाच्या प्रतिष्ठापनेसह एकूणच वातावरण मंगलमय होणार आहे. कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे वित्तीय निकाल, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील स्थिरता आणि एकूणच अर्थव्यवस्थेतील मळभ यानिमित्ताने दूर होण्याची शक्यता आहे.
दक्षिणेतील ओणमपासून सण-समारंभाच्या हंगामाला सुरुवात होत असल्याचे मानले जाते. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव म्हणजे आनंदोत्सवच. राहत्या घरातील वातावरण मंगलमूर्तीच्या आगमनाने प्रसन्न तर होतेच. शिवाय हा मुहूर्त साधूनही घरखरेदीचा अनेकांचा कल असतो. यासाठी आता विकासकही सज्ज झाले आहेत. खरे तर पावसाळा हा या क्षेत्रासाठी मंदीचा कालावधी. मात्र सणांची जोड या व्यवसायाला तेवढाच काडीचा आधार देऊ शकते, या भावनेने मग अनेक नवे गृहप्रकल्प साकारू लागतात. जुने प्रकल्प नव्याने सादर केले जाते. सोबतीला अतिरिक्त सुविधा तर कधी आर्थिक लाभ देऊ केले जातात.
एप्रिल ते जून या २०१६ मधील कॅलेंडर वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत ९५ टक्के सर्वेक्षणात सहभागींनी येत्या सहा महिन्यांत देशातील स्थावर मालमत्ता क्षेत्रातील स्थिती सुधारेल, असे निरिक्षण नोंदविल्याचे फिक्की-नाइट फ्रॅंकचा ताजा अहवाल सांगतो. घरांच्या किमतींमध्ये फार फरक पडणार नाही, असे ६० टक्के जणांना वाटते. अर्थव्यवस्थेतील घटक पुन्हा एकदा हालचाल नोंदवू लागल्याने वाणिज्यिक जागांची विचारणा, व्यवहारही वाढल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

घर खरेदीदार हल्ली तयार घरांनाच अधिक पसंती देतो. ते म्हणतात, घराचा ताबा मिळविणे आणि नव्या घरात राहायला जाणे ही प्रक्रिया अनेकांसाठी कंटाळवाणी ठरू शकते. मुंबईसारख्या शहरात लोक घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे धावत असतात. अशा वेळी घरासाठी दीर्घकालीन प्रक्रिया म्हणजे वेळ दवडणे, अशी त्यांची भावना असते. गेल्या काही वर्षांमध्ये राहण्यासाठी तयार अशा घरांमध्येच वास्तव्य करण्याची पसंती वाढल्याचे दिसून येत आहे. प्रकल्प पूर्ण होण्यात विलंब, कर्जाचे मासिक हप्ते आणि भाडे मूल्याकरिता वाढलेला दबाव अशा विविध घटकांमुळे तयार घरांची मागणी वाढली आहे. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील अस्थिरतेमुळे कोणतीही जोखीम उचलायला घर खरेदीदारही तयार नसतो. अशा वेळी किंमत जास्त वाटली तरी भविष्यातील अनिश्चिती टाळली जाते. त्वरित घर खरेदी केली तर विकासकही मोठय़ा प्रमाणात सूट-सवलती देऊ करतात. अशा वेळी घरांच्या किमती ६ टक्क्यांपर्यंत कमी होतात. विशेषत: निमशहरांमध्ये विकसित होत असलेल्या ग्रामीण भागात अशा तयार घरांकडे असलेला वाढता कल त्वरित नजेरत येत आहे.
रजीब दाश
टाटा हाऊसिंगच्या विपणन
आणि विक्री विभागाचे सहायक उपाध्यक्ष

वस्तू व सेवाकर विधेयकामुळे तसेच सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे विकासक, घर खरेदीदार यांच्यामध्येही यंदा कमालीचा उत्साह आहे. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टलाही वेग येण्याची शक्यता आहे. भारताच्या स्थावर मालमत्ता क्षेत्राला उज्ज्वल भविष्य असल्याचे सांगितले जाते. सध्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत १० टक्क्यांपर्यंतचे प्रमाण राखणारे हे क्षेत्र २०३० पर्यंत १५ टक्के असेल, असे नमूद केले जाते. २०२२ पर्यंत सर्वाना घरे हे सरकारचेही उद्दिष्ट आहेच.

गेल्या सलग सहा तिमाहीनंतर यंदाच्या तिमाहीत घर खरेदी-विक्रीबाबत वातावरण तयार झाले आहे. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत तर यंदा त्याबाबतचे आशादायक चित्र अधिक रंगीत झाले आहे.
डॉ. साम्तक दास
नाइट फ्रँक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व राष्ट्रीय संचालक

स्थावर मालमत्ता क्षेत्राला आता बँकांचीही बऱ्यापैकी साथ मिळण्याची शक्यता आहे. गृह कर्जावरील व्याजाचे दर गेल्या काही महिन्यांपासून अपेक्षेप्रमाणे कमी झाले नसले तरी आकर्षक योजना बँकांमार्फत येऊ घातल्या आहेत. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणीमुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढून अर्थव्यवस्थेत अधिक पैसा येण्याचे हेरून स्टेट बँकेने तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गृह कर्जाचा विशेष व्याजाचा दर उपलब्ध करून ही संधीही गाठण्याचे ठरविले आहे.
गणेशोत्सवाच्या रूपाने सुरू होणारा सणांचा हा उत्सव स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी त्यांचा मुख्य व्यवहार कालावधी असलेल्या दसरा-दिवाळीकरिता पूरक वातावरण तयार करणारा मंच म्हणूनही पाहिला जातो. यंदाच्या दमदार मान्सूनने साऱ्याच गटातील ग्राहकांकडून यंदा खरेदीची वाढती अपेक्षा विकासक व्यक्त करत आहेत.
वीरेंद्र तळेगावकर veerendra.talegaonkar@expressindia.com