करोनाच्या संकटाने अनेकांची स्वप्ने धुळीस मिळाली. अनेकांचा संसार विस्कटला, त्यांच्यावर मूळ गावी जाण्याची वेळ आली. काही जणांनी तर आर्थिक संकटातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. परंतु, पिंपरी-चिंचवडमधील अपघातात दोन्ही पाय गमावलेला मराठमोळा नागेश गुलाबराव काळे हा तरुण लॉकडाउनच्या आर्थिक संकटात तग धरून आहे. तो रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहे. आयुष्य हे खूप अनमोल आहे त्यामुळे आर्थिक संकटांना घाबरून आत्महत्या करू नका असे आवाहन त्याने नागरिकांना केले आहे.