हीविधानसभा निवडणुकीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पराभवाचे विश्लेषण मी केले आहे. मात्र, या पराभवाचे खापर मी कोणावरही फोडणार ना, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी नगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमची भूमिका टोलविरोधी नव्हती, असेही राज एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा गावातील दलित हत्याकांडातील पीडित जाधव कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी राज ठाकरे येथे आले होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण मी केले आहे.  मी कोणावर त्याचे खापर फोडणार नाही. मी जे विश्लेषण केले आहे, त्यात भीषण काही आहे, परंतु ते पूर्ण झालेले नाही. पक्ष किंवा पदाधिकारी त्यास जबाबदार नाहीत असे स्पष्ट केले.
फडणवीस अभ्यासू व चांगले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले व्यक्ती आहेत, अभ्यासू आहेत. परंतु त्यांनी लवकर निर्णय घ्यावेत, असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. शपथविधी समारंभास अनुपस्थित राहिल्याविषयी राज म्हणाले ,‘केवळ २० मिनिटांच्या कार्यक्रमासाठी तेथे जाऊन काय करणार, मात्र तुम्ही त्यातून चुकीचा अर्थ काढू नका. मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.’