|| उत्पल व. बा.

‘आदिवासी’ किंवा अन्य समूहवाचक, जातिवाचक उल्लेख जर विभागणीचं द्योतक आहे तर त्या विभागणीपोटी होणाऱ्या परिणामांनाही सामोरं जावं लागेल. ‘वस्तुस्थिती’ ही चीज आदर्श, सिद्धान्त, विचारधारा या सगळ्याला पुरून उरणारी असते. जात, आयडेंटिटी, अस्मिता या गोष्टी त्रासदायक असल्या तरी त्या ‘वस्तुस्थिती’ आहेत. त्यामुळे सामोरं जाताना आयडियॉलॉजिकल पाया असलेली स्ट्रॅटेजी वापरल्याशिवाय तरणोपाय नाही.

दि नकर मनवर यांच्या ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेतील एका उल्लेखावरून जो वाद सुरू झाला तो एकाच वेळी खेदजनक आणि विचारप्रवृत्त करणाराही आहे. ‘विचारप्रवृत्त करणारा’ असं म्हणण्याचं कारण हे की, या वादाच्या निमित्ताने मनात घोळत राहणारे आणि कालांतराने नाहीसे होणारे काही मुद्दे पुन्हा मनात घोळू लागले. त्यांचा संबंध कलाकाराशी आणि कलात्मक अभिव्यक्तीशी आहे. यात अंतिम असं काही बोलता येईल असं वाटत नाही, पण जे जाणवतं ते सांगायचा प्रयत्न करतो.

‘टीकास्वयंवर’ या पुस्तकातील ‘मराठी कादंबरी: प्रेरणा व स्वरूप’ या लेखात भालचंद्र नेमाडेंनी चिं. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबऱ्यांवर विस्तृत टिप्पणी केली आहे. त्यात ‘अगोचर’ या खानोलकरांच्या कादंबरीतील बलात्काराचा एक प्रसंग त्यांनी उद्धृत केला आहे. ‘कुणी तिच्या झिंज्या ओढीत होते तर कुणी तिची चोळी फाडून तिचे घट्ट स्तन चुरगळीत होते’ या वाक्यात ‘घट्ट’ हा शब्द लेखकाने वाचकांचे लिंगसंवेदन उत्पन्न करण्यासाठी म्हणून वापरला आहे आणि त्यातून लेखकाची नतिकता उघड होते असं नेमाडे लिहितात. एका हिंसक, निषेधार्ह घटनेचं वर्णन करताना हा कामोत्तेजित करणारा शब्द लेखकाला वापरावासा वाटणं याला त्यांचा आक्षेप आहे. हा आक्षेप पूर्णपणे पटण्यासारखा आहे. परंतु खानोलकरांना ‘मॅटर ऑफ फॅक्ट’ म्हणून हा शब्द वापरायचा होता ही शक्यता असू शकते का, हाही प्रश्न विचारता येऊ शकेल.

हे उदाहरण दिनकर मनवरांच्या कवितेसंदर्भात आठवायचं कारण ‘काय लिहिलं आहे’ आणि ‘काय प्रतीत होत आहे’ यात फरक असण्याची शक्यता नेहमीच अस्तित्वात असल्याने कलाकृतीला ‘अभिव्यक्ती’ आणि ‘अभिव्यक्तीचा परिणाम’ हे दोन आयाम प्राप्त होतातच होतात. कलाकृती त्यातून सुटू शकत नाही हे एका अर्थी दुखद आहे असं म्हणता येईल. पण ते कलाकृतीचं ‘भागधेय’ आहे. दिनकर मनवर यांनी लैंगिक संवेदना उत्पन्न करण्याच्या उद्देशाने किंवा विशिष्ट समूहातील स्त्रीचा अवमान करण्याच्या उद्देशाने लिहिलं नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे हेतूबद्दल शंका नाहीच. पण प्रश्न हेतूचा नसून परिणामांचा आहे.

कवितेत आदिवासी मुलीऐवजी इतर समूहातील मुलीचा उल्लेख असता तर चाललं असतं का, असा प्रश्न या वादासंदर्भात विचारला गेला. अशा वादाच्या प्रसंगी कलाकाराच्या सामाजिक बांधिलकीचा मुद्दाही डोकं वर काढतो. म्हणजे भोवतालच्या जगात इतके प्रश्न असताना तुम्ही अभिव्यक्तीचं काय घेऊन बसलात? तुम्ही प्रत्यक्ष कृती कधी करणार? असे प्रश्न विचारले जातात. लेखक-कवीच्या ‘लेखक-कवी असण्या’तच अंतर्भूत असलेल्या गुणधर्माच्या आधारे, कृतिशील लेखक-कवींच्या उदाहरणांच्या आधारे याची उत्तरे देता येतील. पण त्याने वाद शमत नाही. याचं कारण कलाकृतीमुळे निर्माण झालेली भावनिक अस्थिरता हे आहे.

समग्रपणे विचार करत तयार झालेली मनोभूमिका आणि भावनिक स्थिरता ढळवणारं काही घडलं की त्यावर हल्ला चढवणारी मनोभूमिका यात दुसरी बऱ्याचदा जिंकते. दिनकर मनवर गंभीरपणे कविता लिहिणारे कवी आहेत, त्यांचं सामाजिक भान जागृत आहे – प्रखर आहे हे मुद्दे भावनिक स्थिरतेला धक्का लागल्यावर लक्षात घेतलं जाऊ शकत नाहीत. (खरं तर भावनिक स्थिरतेला धक्का लागला की एखादा विचारी अभ्यासकदेखील तीव्रतेने प्रतिक्रिया देऊ शकतो. बौद्धिक क्षमता असूनही जाणिवांचे अनेक आयाम संवेदनेच्या कक्षेत राहणं हे आपलं- सेपियन्सचं- एक लक्षण आहेच.) दुसरा मुद्दा तफावतीचा आहे आणि तो महत्त्वाचा आहे.

कवितेतील उल्लेख न खटकणारे लोक जसे आहेत तसाच तो उल्लेख खटकणारे लोकही आहेत. त्यातही आदिवासी मुलीचा संदर्भ असल्याने विरोधाला आणखी धार आहे. यातील आदिवासी हा मुद्दा बाजूला ठेवून फक्त अवयवाचा विचार केला तर असं दिसतंच की, स्त्रीच्या अवयवांशी पुरुषाची लैंगिक इच्छा घट्ट जोडून टाकली गेली आहे. ‘स्तन’ हा शब्द उच्चारला किंवा स्तनांचं चित्र डोळ्यापुढे आणलं की किती पुरुषांना बाळाचं दुग्धपान आठवतं, किती पुरुषांचं लैंगिक संवेदन जागं होतं आणि किती पुरुषांमध्ये पूर्ण न्यूट्रॅलिटी जागी राहते असा प्रयोग करून बघायला हरकत नाही. आणि लैंगिक संवेदन जागं होत असेल तरी अपराधी वाटायचं कारण नाही.

कवितेतील उल्लेखाने जो वाद सुरू झाला तो समाजातील तफावतीकडे निर्देश करतो. ही कविता वाचताना वर्गातील आदिवासी मुलीला संकोचल्यासारखं होईल असा एक मुद्दा पुढे आला आहे. व्यवहार्य अडचण म्हणून हा मुद्दा मान्य होण्यासारखा आहे. जगण्यात आणि मानसिकतेत तफावत असताना एका दृष्टिकोनाचा आग्रह धरणं आपल्याला टिकाऊ उत्तरांकडे नेत नाही. ‘आदिवासी’ किंवा अन्य समूहवाचक, जातिवाचक उल्लेख जर विभागणीचं द्योतक आहे तर त्या विभागणीपोटी होणाऱ्या परिणामांनाही सामोरं जावं लागेल. ‘वस्तुस्थिती’ ही चीज आदर्श, सिद्धान्त, विचारधारा या सगळ्याला पुरून उरणारी असते. जात, आयडेंटिटी, अस्मिता या गोष्टी त्रासदायक असल्या तरी त्या ‘वस्तुस्थिती’ आहेत. त्यामुळे सामोरं जाताना आयडियॉलॉजिकल पाया असलेली स्ट्रॅटेजी वापरल्याशिवाय तरणोपाय नाही. आदिवासी, मुलगी आणि स्तन हे तीन विषय/शब्द खरं तर सामाजिक रचित, सांस्कृतिक रचित आणि जैविक रचित या तीन रचितांचं आणि ती एकमेकांत गुंतलेल्या वास्तवाचं प्रतिनिधित्व करतात. कवितेतील उल्लेखाने कुणी दुखावलं जायचं, कुणाला राग यायचं काहीच कारण नाही हे एका बाजूला बरोबरच आहे. यात राजकीय हेतू असतील तर तो आणखी वेगळाच मुद्दा आहे! पण या उल्लेखाने खरोखरच कुणी दुखावले गेले असतील तर त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे असं वाटतं.