दिवाकर रावते परिवहन मंत्री

परिवहन यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय काय तर वाहतूक व्यवस्था. वाहतूक व्यवस्थेचे नियोजन योग्य पद्धतीने झाले पाहिजे. अपघातांपासून सर्वाना दूर ठेवले पाहिजे. वेळच्या वेळी मदत मिळाली पाहिजे हा त्यामागील उद्देश आहे. सध्याच्या घडीला मुंबई शहरात ३० लाख १५ हजार ५०० वाहने आहेत. लाखो वाहने मुंबईत येतात. रस्ते वाढीला तर मुंबईत वाव नाही आणि ते वाढवायचे म्हटले तर अडचणी येतात. प्रचंड लोकसंख्येच्या माऱ्याने वाहतुकीवर ताण पडत आहे. त्यामुळे लोंढे थांबवा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जेवढी माणसे वाढत आहेत तेवढय़ाच प्रमाणात वाहतूक व्यवस्था करावी लागत आहे. वाहतुकीची निर्माण झालेली समस्या कमी करण्यासाठी रिक्षा परवाने  खुले केले. मुंबईत वाहतुकीचा, पार्किंगचा, वाहने कुठे थांबवायची हा विषय महत्त्वाचा आहे. जगाचे या मुंबईकडे लक्ष आहे. शहरातील वाहनांची गर्दी कमी करायची असेल तर रोप वे हे पर्याय ठरतील. त्याचप्रमाणे बेस्ट आणि रेल्वेचे सूत जूळवून दिले तर बेस्टलाही नक्की फायदा मिळेल. मात्र बेस्ट ही पहिल्यापासून तोटय़ात आहे आणि युनियनमुळेच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बेस्टमध्ये परिस्थिती विचित्र आहे. बेस्टमध्ये पगाराचा प्रश्न आहे. कामगार आणि संघटन एकत्र आले तर बरेच काही चांगले होऊ शकते. एसटीचीही अवस्था फार बिकट आहे. प्रवासी संख्या घटली असून ७५ किंवा त्यापुढे प्रवासी भारमान असेल तरच चालविणे शक्य आहे. सध्या भारमान हे ४८ टक्के असून ही बाब फार गंभीर आहे. एसटी तोटय़ात असून पगार देणार कुठून असा प्रश्न आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. त्यातच रोड सेफ्टी बिलामुळे एसटी मार्गावर खासगी वाहतुकीला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे एसटी डबघाईला जाईल, असे एसटीच्या संघटना सांगतात. एसटी बुडणार नाही, ही ग्वाही मी देतो. मात्र कामगार संघटनांनीही एसटी टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी वेतन करारासंदर्भातील दुराग्रह बाजूला ठेवला पाहिजे.