|| माधव वझे

ती असे खूप काही भडाभडा बोलत होती, ते सगळे लालनने लिहिले असते आणि म्हटले असते की तिच्या जीवनात प्रेयस आणि श्रेयस असे स्वतंत्रपणे काही नाही. प्रेयस हेच श्रेयस आणि श्रेयस तेच तिचे प्रेयसही.

लालन सारंगचे निधन झाल्याचे ज्या क्षणी कळले त्या क्षणी मनात आले, सध्या ‘लोकसत्ता’मध्ये विविध क्षेत्रांतल्या नामांकित व्यक्ती त्यांच्या त्यांच्या जीवनातल्या प्रेयस आणि श्रेयसबद्दल लिहीत आहेत, तर लालनने काय लिहिले असते? मनात आले, तिच्या आणि आपल्या गाठीभेटी काही फार झाल्या नाहीत. पण कणकवलीला वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानमध्ये तिच्या मुलाखतीच्या निमित्ताने एकत्र प्रवास केला तेव्हा पोटतिडकीने ती जे जे सांगत होती ते तिने लिहिले असते. ‘सखाराम बाइंडर’ नाटकामध्ये चंपाची भूमिका केली आणि रातोरात आपण प्रसिद्ध झालो, एक समर्थ अभिनेत्री म्हणून सगळे आपल्याकडे पाहायला लागले याचे समाधान आहेच. कारण आपला जन्माचा जोडीदार आणि नाटकाचा दिग्दर्शक कमलाकर चंपाच्या भूमिकेसाठी पार कोल्हापूपर्यंतच्या अभिनेत्रींचा विचार करत होता. नाटककार तेंडुलकरांना तर लालन चंपा म्हणून शोभणार नाही असेच वाटत होते. आणि स्वत:ला तरी चंपा साकारावी असे कुठे वाटत होते? आपल्याला तर लक्ष्मीची भूमिका करायची इच्छा होती. पण डॉ. कुमुद मेहता यांनी आग्रह धरला, आणि ती भूमिका आपल्याला मिळाली. भूमिका खूप गाजली. पण कशामुळे? तर चंपा सेक्सी आहे, तिच्या चालण्या बोलण्यातून तिच्या अंगांगातले आवाहन लालन सारंग व्यक्त करते, रंगमंचावर साडी बदलण्याचा सीन आहे (म्हणतात), तो ती बिनधास्त करते यासाठी. अरे हो, पण त्यासाठी सारंग आणि मी दोघांनी मिळून किती विचार केला असेल, किती अभ्यास केला असेल आणि त्याहीपेक्षा चंपाच्या वागण्या-बोलण्यातल्या तपशिलांचा किती सराव केला असेल, ते प्रयोग पाहताना तुमच्या सराईत नजरेला जाणवलेच नाही का? होय, माझे शरीर आकर्षक आहे, जसे चंपाचे आहे. आणि त्याचा मला अभिमान आहे. पण सखारामच्या घरी आल्यापासून चंपाची चालणारी घालमेल लालन फार चांगली व्यक्त करते याचे कौतुक फक्त अगदी मोजक्याच माणसांनी केले ना?

माझा आवाज तसा कोता होता. पण मग विचार केला की चंपा खर्जातल्या आवाजात बोलेल, आणि तिच्या बोलण्यात एक प्रकारचा थंडपणा असेल. आणि आठवारी साडी पाचवारीसारखी कशी नेसायची, साडीच्या निऱ्या सांभाळत दोन पायांमध्ये अंतर ठेवत कसे चालायचे, डोक्यावर पदर कसा घ्यायचा आणि तो सांभाळायचा.. एक की दोन.. हजार गोष्टींचे अवधान!

मी म्हणते ठीक आहे, नाही सगळ्यांच्या लक्षात सगळे येणार. पण रंगमंचावर मी चंपा उभी केली, म्हणून काय तुम्ही माझे दररोजचे जगणेच हराम करू पाहाल म्हणता की काय?

सखाराम बाइंडर रंगमंचावर आले आणि पुण्या-मुंबईत लिंगवाद निर्मूलन समिती निर्माण झाली. तुम्ही निषेध करता, नाटकाविरुद्ध घोषणा देता, मोर्चे आणता, इथपर्यंत ठीक आहे. पण रस्त्यामध्ये मला पाहून तुम्ही गलिच्छ शेरेबाजी करता, टेलिफोनवर अश्लील ओंगळ बोलता, धमक्या देता, याचा अर्थ काय? असल्या प्रकारांना मी आणि सारंग भीक घालणारे नाही!

आम्हाला सल्ला देत होतेच कोणी कोणी की करा नाटक बंद. त्याची निर्मिती आहे वेलकम थिएटर्सची. आम्ही तो सल्ला मानला नाही. प्रश्न होता, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा. सारंगच्या आणि माझ्या कधी स्वप्नातसुद्धा आले नसते की अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्दय़ावर आम्हाला आमचे आयुष्य पणाला लावावे लागणार आहे. पण डॉ. कुमुद मेहता यांनी आम्हाला उमेद दिली. त्या स्वत:च सेन्सॉर बोर्डाच्या सभासद होत्या. आणि त्यांच्या बरोबर होत्या, सरोजिनी वैद्य. त्या दोघी आमच्या बाजूने. कुमुदबेननी तर न्यायालयीन लढाईची तयारी म्हणून प्रख्यात वकिलांशी आमची भेट घडवून आणली. त्या वेळी आम्ही एक प्रयोग खास बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी केला म्हणून आमच्यावर टीकेची झोड उठली. पण बाळासाहेबांना नाटकामध्ये काहीच आक्षेपार्ह आढळले नाही आणि निदान राजकीय आघाडीवर आम्हाला थोडासा दिलासा मिळाला. त्या दिवसांत पैशाची तर फारच चणचण होती. सारंगने ते पुस्तकात लिहिलेपण आहे. श्रीकांत लागू मधून मधून लागतील तसे पैसे देण्यासाठी न्यायालयात यायचा आणि आला की जेवायला न्यायचा. श्रीकांत आला की जेवायला नेणार हे मनात ठेवून सारंग त्याला न्यायालयात बोलावीत असायचा. असे ते दिवस. रात्र रात्र चर्चा, टेलिफोन्स, कागदपत्रांची जुळवाजुळव. अपरंपार कष्ट करून आम्ही तो लढा दिला आणि जिंकलोही. असे जिंकलो की सेन्सॉर बोर्डाचे अस्तित्वच धोक्यात येत होते. नंतर सगळ्यांनी अभिनंदनाचा भडिमार केला. पण प्रत्यक्ष लढाई सुरू होती तेव्हा मराठी रंगभूमीवरचे असे कितीसे होते उभे आमच्या बाजूने, खांद्याला खांदा भिडवून? कितीजणांनी आमची सोबत केली? सखाराम बाइंडर नाटक आम्हाला आवडले होते, ते रंगमंचावर यावे अशी आमची इच्छा होती, त्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीही नाही याबद्दल आम्ही ठाम होतो, त्यामुळे कोणतीही तडजोड करायची नाही हे ठरलेच होते, त्यासाठी धोका पत्करावा लागेल हे दिसतच होते, तो धोका आम्ही पत्करला, विरोधकांना अहिंसक मार्गाने सामोरे गेलो, त्यासाठी तनमनधन वेचले, आणि शेवटी जिंकलो तेव्हा आपणच एकटे जिंकलो असे नाही तर अभिव्यक्तिस्वातंत्र्याची लढाई आपल्या रंगभूमीने जिंकली असल्याचे समाधान मिळाले. खूपच आनंद झाला. पण आम्ही उन्माद केला नाही. उन्माद करणारे आम्ही नाही. उन्माद करण्यासारखे त्यात काही होते असेही नाही.

ती असे खूप काही भडाभडा बोलत होती, ते सगळे लालनने लिहिले असते आणि म्हटले असते की तिच्या जीवनात प्रेयस आणि श्रेयस असे स्वतंत्रपणे काही नाही. प्रेयस हेच श्रेयस, आणि श्रेयस तेच तिचे प्रेयसही.

नट, नटी विविध रंगरूपाच्या भूमिका करत असतात. एका नाटकामध्ये भूमिका केल्यानंतर दुसऱ्या नाटकातल्या भूमिकेचा त्यांचा विचार सुरू होतो. पण अशा प्रवासात एखादी भूमिका नटनटींची सोबत करत राहते का? एक माणूस म्हणून त्या नटनटीच्या जीवनात त्या भूमिकेचे काही स्थान असते किंवा काय? प्रत्येक नट आणि नटीबरोबर या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी असतील हे उघड आहे. एक माणूस म्हणून लालनच्या विकासामध्ये तिच्या दोन भूमिकांनी कोणती भूमिका केली ते तिने स्वत:च सांगितले आहे. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘रथचक्र’ या नाटकामध्ये एका आईच्या भूमिकेमध्ये लालन विडय़ा फुंकणाऱ्या तिच्या मुलाच्या हातावर एक आणा टेकवते, आणि विडय़ा मात्र ओढू नकोस असे आर्जव करते. ते दृश्य साकारताना आपल्यामधील आई कशी जागी होत असे आणि आई म्हणून त्याचा किती मानसिक ताण येत असे ते तिने सांगितले आहे. ‘कमला’ हे नाटक तेंडुलकरांचे. नाटकात जयसिंग जाधव हा पत्रकार आहे. त्याची बायको सरिता, त्याला आलेल्या टेलिफोन्सच्या नोंदी ठेवण्यापासून त्याचे बूट पॉलिश करण्यापर्यंत अनेक कामे विनातक्रार सातत्याने करत असते. पण एखाद्या गुलामापेक्षा आपले या घरातले स्थान काही वेगळे नाही याचे भान आलेली सरिता एका रात्री नवऱ्याच्या इच्छेचा अवमान करून त्याची शय्यासोबत करायचे नाकारते. आपणही आपल्या जोडीदाराप्रमाणे नाटकामध्ये भूमिका करतो, आपणही त्याच्यासारखेच थकतो-दमतो, आणि घरी आल्यावर मात्र जोडीदार वर्तमानपत्र वाचत बसणार आणि आपण मात्र लगेच स्वयंपाकघरात जाऊन कामाला लागतो, हे काय म्हणून? असा प्रश्न लालनच्या मनामध्ये आला आणि तिने कोणताही त्रागा न करता ते जोडीदाराच्या लक्षात आणून दिले. जोडीदारानेही ते समजून घेतले आणि तिला मदत करायला सुरुवात केली.

भूमिकाही नकळत तुम्हाला घडवतात, समृद्ध करतात असे लालनने म्हटले आहे. प्रेक्षागृहात मांडीवर एक तान्हे मूल घेऊन नाटक पाहिलेली एक स्त्री प्रयोगानंतर लालनला भेटायला आली असताना ते मूल काही वेळ संभाळायला ज्या एका अधिकारवाणीने तिने नवऱ्याला सांगितले ते पाहून आपल्याला फारच आनंद झाला असल्याचेही तिने म्हटले आहे.

लालन पुण्यामध्ये स्थायिक झाली, त्यानंतर २००३ मध्ये तिने आणि दीपा लागू या दोघींनी आशा साठे यांनी लिहिलेला ‘स्वयम्’ हा दीर्घाक सादर केला. प्राप्त कटू अनुभवांना शांतपणे सामोरे जाऊन आता आपल्यासारख्याच दुसऱ्या एका स्त्रीला रमा आत्मबळ देऊ  पाहते आहे. एका छान वळणावरची ती तिची शेवटची भूमिका असावी. श्रेयस आणि प्रेयस यांचा सुंदर मेळ असलेली.