मालमोटारीला चुकविताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याजवळील विहिरीत हे वाहन (छोटा हत्ती) कोसळून झालेल्या अपघातात एक ठार, तर तिघे जखमी झाले. बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा प्रकार घडला. गजानन बांगर असे मृताचे नाव आहे.
िहगोली तालुक्यातील सुकडी येथील चौघे औरंगाबाद येथे दुरुस्तीला टाकलेली जीप परत घेऊन जाण्यासाठी येत होते. देवळाई चौकात आल्यावर मालमोटारीला चुकविताना चालकाचे या वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या मालमोटारीने छोटय़ा टेम्पोला धडक दिली. नियंत्रण सुटलेला टेम्पो तसाच पुढे विहिरीत पडला. अपघाताचा आवाज ऐकून आसपासचे लोक मदतीस धावले. विजय वसंत शिरसाट, विष्णू श्रीरंग धोत्रे व संतोष पांडुरंग खिल्लारे या जखमींना विहिरीतून बाहेर काढण्यास मदत केली. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोरीच्या साह्य़ाने जखमींना बाहेर काढले. मृत बांगर याला वाचविण्याचाही प्रयत्न झाला. पण विहिरीतून बाहेर काढताना दोरी तुटल्याने बांगर पुन्हा विहिरीत पडला. वास्तविक, गजानन पट्टीचा पोहणारा होता. मात्र, जखमी झाल्याने त्याला पोहता आले नाही. विहिरीबाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला, असे अपघातातील जखमी विष्णू धोत्रे यांनी सांगितले.