ठाणे येथील कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने यंदाही भारतीय नववर्ष (गुढीपाडवा) स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून यासंबंधी झालेल्या एका बैठकीत पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
तसेच यंदा महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी न्यासातर्फे जनजागरण मोहीम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी महिलांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नववर्ष स्वागत यात्रा संचालन समिती न्यासाचे अध्यक्ष मा. य. गोखले यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय नववर्ष स्वागत यात्रा आयोजनाच्या पाश्र्वभूमीवर नुकतीच बैठक पार पडली. त्यामध्ये स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण, कार्याध्यक्षपदी उत्तम जोशी, निमंत्रकपदी डॉ. अश्विनी बापट, सहनिमंत्रक म्हणून प्रसाद दाते, कार्यालय प्रमुखपदी सुधाकर वैद्य, कोषाध्यक्षपदी श्रीनिवास जोशी आणि सहकार्यवाह म्हणून विनायक जोशी यांची निवड करण्यात आली         आहे.
यंदाच्या वर्षी स्वागत यात्रेमध्ये संस्थांचा सहभाग कसा असेल, त्याचप्रमाणे देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना पायबंद बसावा, यासाठी जास्तीत जास्त महिलांचा सहभाग घेऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महिलांवर होणारे अत्याचार कशा प्रकारे थांबविता येतील, या दृष्टिकोनातून जनजागरण मोहीम हाती घेण्यात येणार          आहे.
स्वामी विवेकानंदांची १५०वी जयंती आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती न्यासाचे प्रसिद्धीप्रमुख रवींद्र कराडकर यांनी दिली.