२३ अधिकाऱ्यांना खंडपीठाची नोटीस
बंधाऱ्यांच्या कामात अफरातफर
औरंगाबाद/प्रतिनिधी
गोदावरी नदीवर बांधलेल्या ११ बंधाऱ्यांच्या कामात दाखल फौजदारी अर्जाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २३ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. परतूरचे माजी आमदार बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती.
गोदावरी नदीपात्रात बांधलेल्या ११ बंधाऱ्यांच्या कामात कोटय़वधीची अफरातफर झाल्याचा आरोप करत लोणीकर यांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरले. या प्रकरणात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाविरुद्ध अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयात फौजदार पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला. हा अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द ठरविला. त्यास लोणीकर यांनी खंडपीठात आव्हान दिले. त्यात २३ अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.    

महिलेची दहा एकर जमीन बळकावली
 परभणी/वार्ताहर
येथील नय्यरजीया ताजीया अहमद (सध्या हैदराबाद) यांच्या नावे असलेली दहा एकर जमीन त्यांच्याऐवजी बनावट महिलेला समोर करून स्वत:च्या नावे करून घेतल्याप्रकरणी नांदेडच्या यश रियालिटीज कंपनीचे भागीदार गणेश नागनाथ फरकडे याच्यासह सातजणांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
मोमीनपुरा येथे राहणाऱ्या नय्यरजीया यांची परभणी शहरात गट क्रमांक ४८ मध्ये दहा एकर जमीन आहे. पतीच्या निधनानंतर त्या हैदराबाद येथे राहण्यास गेल्या. गेल्या १० डिसेंबर रोजी आरोपी गणेश फरकडे, माणिक गोरे (माळीगल्ली), शेरखान हयात खान (कालाबावर), गोपाळ अंभोरे (वर्णा, तालुका जिंतूर) या चारजणांनी कोषागार कार्यालयात नय्यरजीया म्हणून एका बनावट महिलेला उभे केले व दहा एकरची ‘रजिस्ट्री’ करून घेतली. रजिस्ट्रीवर साक्षीदार म्हणून सय्यद रहमान माळी गल्ली व जगन्नाथ जाधव काकडे नगर यांचे छायाचित्र व सह्य़ा आहेत.
आपल्या मालकीची जमीन बनावट रजिस्ट्री झाल्याची माहिती मिळताच नय्यरजीया या हैदराबाद येथून परभणीत परतल्या व त्यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्य़ाचा तपास पोलीस जमादार जाधव करीत आहेत. पोलीस त्या बनावट महिलेचा शोध घेत असून रजिस्ट्री कार्यालयातून तिच्या हाताच्या ठशाचे नमुने तपासणीस घेतले आहेत.

बीड जिल्हय़ात दोघांचा खून; दोघींची आत्महत्या
 बीड/वार्ताहर
उसनवारी पैशाच्या कारणावरून वृद्धास बेदम मारहाण करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार वडवाडी येथे उघडकीस आला. दुसऱ्या एका घटनेत राक्षसभुवन येथील तरुणाला सोने खरेदीच्या कारणावरून जीवे मारण्यात आले. अन्य दोन घटनांमध्ये सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने औषध घेऊन, तर तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
बीड तालुक्यातील वडवाडी येथील रामभाऊ दगडू आगाम (वय ६५) यांच्याकडे असलेल्या उसने पैशाच्या कारणावरून त्यांना बेदम मारहाण करून त्यांचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर भास्कर आगाम यांच्या तक्रारीवरून माणिक अर्जुन धुमाळ व अर्जुन खंडू धुमाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील खामगाव शिवारात सोने खरेदीच्या कारणावरून संदेश धस याला बेदम मारहाण करण्यात आली. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेत सचिन लगडे (कसबा, जिल्हा नगर) याच्या तक्रारीवरून आरोपी चव्हाण पारधीविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
लिंबारुई (तालुका बीड) येथील मदिना शेख महेबूब (वय १९) या तरुणीने विहिरीत उडी घेऊन, तर धारूर तालुक्यातील तांदळवाडी येथील जयश्री किशोर थोरात (वय २३) या विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला.

शस्त्राने भोसकून तरुणाचा खून करणाऱ्यास जन्मठेप
 नांदेड/वार्ताहर
दारू पिण्यास पैसे का देत नाहीस, म्हणून धारदार शस्त्राने भोसकून खून करणाऱ्या विजय कांबळे यास कंधार न्यायालयाने जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणी माहिती अशी- लोहा तालुक्यातील किरोडा येथील नरोजी रंगनाथ जाधव, शंकरराव रामराव माने, चिंतामण नागोराव जाधव हे तिघे पिंपळगाव येथील विवाह समारंभ आटोपून लोहय़ात परतले. शहरातल्या इंदिरानगरजवळ देशी दारूच्या दुकानासमोर विजय नागू कांबळे याने या तिघांस अडवून नरोजी जाधव यास दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने विजयने स्वत:जवळील धारदार शस्त्राने त्याला भोसकले. यात त्याचा मृत्यू झाला. भगवान कदम यांच्या तक्रारीवरून लोहा पोलीस ठाण्यात विजय कांबळेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.
कंधारच्या पोलीस उपअधीक्षक गीता चव्हाण यांनी या प्रकरणी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने या प्रकरणात १५जणांच्या साक्षी नोंदवल्या. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला.
कांबळेविरुद्ध सबळ पुरावा असल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी त्यास जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाची बाजू प्रफुल्ल शेंडगे यांनी मांडली.