विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. जीवनात पहिला मार्गदर्शक कोण असेल तर ते आपले कुटुंबच असते. कुटुंबातील होणारे संस्कार हे आपले व्यक्तिमत्त्व घडवत असते. प्रत्येकात समान क्षमता असते. फक्त त्याचा वापर व त्यावर आपले भविष्य ठरते, असे उद्गार शिबिराचे उद्घाटक जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी काढले. नेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त एकदिवसीय स्पर्धा परीक्षा (एम.पी.एस.सी/यू.पी.एस.सी) मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुरेश ढोके, उद्घाटक जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आयकर उपायुक्त अमित बोबडे, आयकर उपायुक्त श्रद्धा बोबडे, उपविभागीय अधिकारी श्यामकांत मस्के, तहसीलदार आकाश लिगाडे आदी उपस्थित होते. यावेळी संतोष अरसोड व दिलीप लांडगे उपस्थित होते. रचनात्मक आंदोलन या पत्रकार संघाने सुरू केले असून त्यांच्या या उपक्रमामागे जिल्हा प्रशासन ठामपणे उभे राहील, असे आश्वासन जिल्हाधिकारी मुद्गल यांनी यावेळी दिले.
वर्तमानपत्र हे अभ्यासाचे साधन असावे. अग्रलेखांचे वाचन अवश्य करावे. विद्यार्थ्यांनी शिस्त व वेळेचे व्यवस्थापन करावे. आपण वेळ वाया घालवत नाही, तर स्वत:ला वाया घालवित असतो. प्रत्येक दिवशी आपण काहीतरी शिकून ‘व्हॅल्यू अ‍ॅडिशन’ करावे. यशापेक्षा अपयशाने मला जास्त शिकवले. अपयश आल्यावर पुन्हा परीक्षा देताना निराश होऊ नये. इंग्रजी व जनरल नॉलेजला असाधारण महत्त्व आहे, असा सल्ला अमित बोबडे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.  आवडीचे ध्येय साध्य करण्यासाठी किती वेळ लागेल, हे निश्चित करावे. जी माणसे अपयशाचे समर्थन करतात असे लोक जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. प्रतिकूल परिस्थितीतही माणूस मोठा होऊ शकतो. व्यक्तिमत्त्व, संभाषणाची कला, अंतरंगातील गुण आदी गोष्टीस खूप महत्त्व असते. नकारात्मक व्यक्तिमत्त्वातून बाहेर पडावे, असा सल्ला श्यामकांत मस्के यांनी दिला.
या शिबिराला सातशे विद्यार्थी-विद्यार्थिनी हजर होत्या. संतोष अरसोड, प्रा. सुरेश ढोक, दिलीप लांडगे, किशोर खोब्रागडे, गणेश राऊत, प्रा. सईद खान, संकेत सदावर्ते, प्रभाकर मेश्राम, संदीप ठक, संतोष कोल्हे, रमेश दीक्षित, विनोद कापसेसह पत्रकार उपस्थित होते.