लोकमंगल उद्योग समूहाअंतर्गत कार्यरत लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने १७ नोव्हेंबर रोजी १४ व्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा आयोजिला असून यात १७० जोडपी विवाहबध्द होणार आहेत. सामुदायिक विवाह सोहळयाची यंदाचे आठवे वर्ष असून आतापर्यंत १५६१ जोडप्यांचे विवाह झाले आहेत. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता गोरज मुहूर्तावर हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात १७० वधू-वरांचा सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. याबाबतची माहिती लोकमंगल फौंडेशनचे संचालक रोहन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सामुदायिक विवाह सोहळयासाठी तीन लाख ७५ हजार चौरस फुटांचा भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. या वेळी एक लाख वऱ्हाडी मंडळींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रक्तदान शिबिरही भरविण्यात येणार आहे. भोजन विभागासाठी पन्नास हजार चौरस फुटांचा तर मुख्य विवाह सोहळयासाठी एक लाख ६५ हजार फुटांचा शामियाना उभारण्यात आला आहे. विवाहानंतर वधू-वरांनी आयुष्यात कसे वागावे, नवीन घरात प्रवेश केल्यानंतर वधूंनी सासरच्या मंडळींशी कसे समरस व्हावे, तसेच आरोग्य विषयक जागरूकता, स्त्रीभ्रूणहत्या विरोधी भावना अशा सामाजिक जाणिवांचे समुपदेशन केले जाणार आहे. निरूपणकार विवेक घळसासी, सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सुधा कांकरिया (नगर), पुण्याच्या यशदा संस्थेचे समन्वयक गणेश शिंदे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी व लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी खासदार सुभाष देशमुख हे समुदपदेशनासाठी विचार मांडणार आहेत. वधू-वरांना पोशाख, संसारोपयोगी भांडी, मणी मंगळसूत्र, जोडवी आदी वस्तू दिल्या जाणार आहेत. विवाह सोहळयापूर्वी वधू-वरांची सामुदायिक वरातही काढली जाणार असल्याचे रोहन देशमुख यांनी सांगितले. या वेळी लोकमंगलचे संचालक अविनाश महागावकर, शहाजी पवार आदी उपस्थित होते.