प्रत्येक विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला योग्य मार्गदर्शन वेळेत मिळणे आवश्यक असते. लोकसत्ता च्या ‘यशस्वी भव’ चा उपक्रम हा विद्यार्थ्यांसाठी उत्तम मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन आ.चरणसिंग सप्पा यांनी येथे मुलुंड येथे व्यक्त केले. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मुलुंड पश्चिम येथील शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लोकसत्ता यशस्वी भव मार्गदर्शन शिबिर व मार्गदर्शक पुस्तकाचे वितरणााचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. राजीव गांधी सर्व शिक्षा अभियान व सेवक संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचे दृष्टीने उपक्रम राबविले जातात व अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणवंत मुलुंडकर’ या पुरस्काराने सत्कार देखील केला जातो. आता लोकसत्ताच्या ‘यशस्वी भव’ योगदानामुळे गुणवंत मुलुंडकर हा दहावीच्या शैक्षणिक वर्षांत मुंबईतून नव्हे तर महाराष्ट्रातून प्रथम येऊ शकता असा आशावाद सप्रा यांनी व्यक्त केला. यावेळी मुलुंड विद्यामंदिर वामनराव मुरंजन विद्यालय राजीव गांधी विद्यालय व पी.के.रोड महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले होते. ‘यशस्वी भव’चे तज्ज्ञ शिक्षक अखिल भोसले यांनी इंग्रजी तर , सुप्रिया अभ्यंकर यांनी बीजगणित या विषयांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास लोकसत्ताचे पश्चिम विभाग प्रमुख मंगेश ठाकूर, मुंबई शहर वितरण प्रमुख रोनक अन्नी मिरेकर, माजी नगरसेवक बी.के.तिवारी, परशुराम मिरेकर व मनोरमाताई पाटील, इशान्य मुंबई काँग्रेस अध्यक्ष मनोज दुबे, वामनराव मुरंजन संस्थेचे अध्यक्ष डॉ.आनंद प्रधान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सय्यद अयुब यांनी केले.