ठेकेदाराच्या मनमानीपुढे प्रशासन हतबल?
डोंबिवली परिसरात मोठय़ा प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साठू लागले असून महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही यासंबंधी कारवाई होत नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. ठेकेदाराच्या मनमानीपुढे प्रशासनाचे काहीच चालत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. कचरा कुंडय़ांमध्ये आठवडाभर कचरा साठून असतो, असे चित्र काही ठिकाणी दिसू लागले आहे.  
महापालिकेकडून गाडय़ांसाठी डीझेल मिळत नाही. त्यामुळे गाडय़ा बाहेर काढता येत नाहीत, अशी उत्तरे मे. अ‍ॅन्थोनी वेस्ट हॅन्डलिंगचे कर्मचारी नगरसेवकांना देत आहेत. काँग्रेस पक्षातर्फे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित करण्यात आला.
 डोंबिवली पश्चिमेत कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराची वाहने दररोज येत नाहीत. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कुंडीभोवती कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत.
 महापालिकेने ठेकेदाराचे काम काढून घेतले आहे. त्याचे काही कर्मचारी औद्योगिक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे पालिकेच्या ड आणि ह प्रभागात ठेकेदाराचे काम सुरू आहे. हे काम काढून घेण्यात येणार आहे. डोंबिवली पश्चिमेत यापुढे पालिकेकडूनही कचरा उचलण्याचे काम सुरू करण्यात येईल. घनकचरा विभागाचे उपायुक्त अनिल डोंगरे हे प्रत्येक बाबतीत निष्क्रिय व अपयशी ठरत असल्याची टीका नगरसेवक मंदार हळबे यांनी केली.