मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापुरातच व्हावे या मागणीसाठी सोलापूर बार असोसिएशनने शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोच्र्यात शेकडो वकील मंडळींचा सहभाग होता. याच प्रश्नावर बार असोसिएशनच्या आवाहनानुसार जिल्हा न्यायालयात वकिलांनी येत्या १३ सप्टेंबपर्यंत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घातल्यामुळे पहिल्या दिवशी न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे सामान्य पक्षकारांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून आले.
उच्च न्यायालयाचे खंडपीठ सोलापूर येथे व्हावे, अशी स्थानिक वकिलांची जुनी मागणी आहे. खंडपीठासाठी कोल्हापुरातही आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरात आंदोलन पेटल्यानंतर इकडे सोलापुरातही बार असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन हाती घेतले आहे. त्याचाच भाग म्हणून दुपारी जिल्हा न्यायालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. मिलिंद थोबडे व सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिवशंकर घोडके यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोच्र्यात शेकडो वकील सहभागी झाले होते. यात व्ही.डी. फताटे, रजाक शेख, मंगला चिंचोळकर, व्ही. एस. आळंगे आदींचा प्रामुख्याने समावेश होता.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर त्याचे रुपांतर सभेत झाले. बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. उच्च न्यायालयाचे खंडपीठ किंवा फिरते खंडपीठ सोलापुरात होणे सोयीचे असून त्याची पूर्तता तातडीने करावी, अशी मागणी वकिलांनी केली. दरम्यान, खंडपीठाच्या मागणीसाठी न्यायालयीन कामकाजावर आठवडाभर बहिष्कार घालण्यात आला आहे. शनिवारी पहिल्या दिवशी बहिष्कारामुळे न्यायालयीन कामकाजावर विपरीत परिणाम झाला. मात्र, त्यामुळे सामान्य पक्षकारांची मोठी गैरसोय होत असल्याचे पाहावयास मिळाले.