दारावे गावातील भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीबरोबर एका तरुणाचा वाद झाला होता. या तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यावर त्याची हत्या झाल्याचा संशय असलेल्या वडिलांनी या भंगार वेचणाऱ्या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक केली आहे.
हनुमंत भोईर यांचा भंगार वेचत असलेल्या अशोक राठोड या व्यक्तीबरोबर वाद झाला होता. हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर सामोपचाराने मिटविण्यासाठी अशोक यांची आई कमला राठोड यांनी पुढाकार घेतल्याने हा वाद मिटला होता. या वादानंतर अशोक राठोड हा दारावे गावात थांबला असताना मंगळवारी उशिरा त्याची हत्या झाल्याचे समोर आले. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मारेकरी हनुमंत भोईर यांचा मुलगा वैभव याचा रेल्वे अपघातात वाशी येथे मृत्यू झाला होता. मात्र या अपघातामध्ये अशोक यानेच आपल्या मुलाला ठार मारल्याचा संशय व्यक्त करीत हनुमंत भोईर यांनी  अशोक राठोड यांच्याबरोबर मंगळवारी वाद उकरून काढला. दारावे गावात हनुमंत भोईर यांनी अशोक राठोड याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांनी दिली. आरोपीला अटक करण्यात आली आहे.