महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीसाठी असलेल्या ‘युवक भारती’ या मराठीच्या पाठय़पुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कवी लोकनाथ यशवंत यांची कविता ‘नव्या शहराविषयी’ आणि अकोला जिल्ह्य़ातील चिखलगावचे चित्रकार श्रीधर अंभोरे यांची ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी घेतलेली मुलाखत समाविष्ट करण्यात आली आहे. हे दोघेही कवी, कलावंत विदर्भाचे आहेत. या पाठय़पुस्तकात संत नामदेवांपासून सुरू झालेला कवितेचा प्रवास लोकनाथ यशवंत यांच्या कवितेवर थांबविण्यात आला आहे. या कविता विभागात संत जनाबाई, संत शेख महंमद, महात्मा ज्योतीराव फुले, बहिणाबाई चौधरी, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, शांता शेळके, नारायण सुर्वे आणि फ.मुं. शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.