आपल्याकडे पाणी भरपूर असूनही टंचाई जाणवते. पाण्याचा समतोल राखण्याचे काम करणारे वृक्ष आणि जंगल उद्ध्वस्त होत आहेत. यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड आणि संवर्धन आवश्यक आहे. त्याकरिता लोकसहभाग महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन वृक्षमित्र वसंत ठाकरे यांनी येथे केले.मनमाड बचाव कृती समितीतर्फे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या विषयावर येथील मध्य रेल्वे माध्यमिक विद्यालयात व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. जलतज्ज्ञ मुकुंद धाराशिवकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी जगन्नाथ धात्रक, अशोक परदेशी, संतोष बाकलीवाल आदी उपस्थित होते. पाणी असूनही मनमाडसह इतर अनेक ठिकाणी कायम टंचाई जाणवते. पाणी जमिनीत मुरत नसल्यानेच टंचाईची परिस्थिती उद्भवते. त्यामुळे सर्वानी एकत्रितपणे उपाययोजना करण्याची गरज जलतज्ज्ञ मुकुंद धाराशिवकर यांनी व्यक्त केली. शहरात अनेक वर्षांपासून टंचाई जाणवत असून यासंदर्भात धाराशिवकर यांनी कार्यकर्त्यांसह परिसराची पाहणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार येथील रेल्वे बंधाऱ्यातील गाळ मागील वर्षी काही प्रमाणात काढण्यात आला. त्यानंतर पावसामुळे हा बंधारा भरला. परिणामी परिसरातील अनेक भागांमध्ये कुपनलिकांना पाणी वाढले. या बंधाऱ्याच्या पुढे एक कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. त्याची योग्य दुरुस्ती करून पाणी साठवण्यासाठी तो उपयोगात आणता येऊ शकेल. मुख्य म्हणजे मनमाडसाठी पाणी साठवणूक व्यवस्था करावी लागेल. योग्य नियोजन करून त्या पाण्याचे वितरण करावे लागेल. पाणी जमिनीत मुरत नसल्याने सर्वत्र टंचाई उद्भवत असल्याकडे त्यांनी प्रकाशझोत टाकला. पाण्याची जपवणूक, साठवणूक कशी करावी याविषयीही त्यांनी माहिती दिली. अशोक परदेशी यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन राजकमल पांडे यांनी केले. कृती समितीने हाती घेतलेल्या नदीपात्र स्वच्छता मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल दिनेश मुनोत, सलीमभाई सोनावाला, अॅड. साधना गायकवाड आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.