वर्णवाद्यांनी मनुवादातून लादलेल्या रुढींना बहुजन समाजाला गंडेदोरे, ताईत यात बांधून लुटारू झालेल्या मनुवाद्यांचे गंडेदोरे, ताईत झुगारून फेका. ही गुलामगिरीची लक्षणे आहेत, असे प्रतिपादन लाखांदूर तालुक्यातील जैतपुर बारव्हा येथे बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून नवयुवक सामाजिक पंचशील स्मारक समितीतर्फे भव्य अनावरण सोहळ्याच्या उद्घाटकीय भाषणातून चित्रपट निर्माता मोरेश्वर मेश्राम यांनी केले.
 यावेळी व्यासपीठावर मूर्तीदाता जैतपूरचे सरपंच विजय हुकरे, सामाजिक कार्यकर्ता सुनील भोवते, शिक्षण व आरोग्य सभापती संजय गाढवे, बालकल्याण सभापती रेखा भुसारी, व्यंकटराव मेश्राम, दीपक चिमनकर, श्रीकांत दोनाडकर, बळीराम साखरे, मनोज दामले, अशोक नंदनवार, डॉ. नितीन मेश्राम, मनोज बन्सोड उपस्थित होते. मेश्राम म्हणाले की, वर्णवादी व मनुवाद्यांच्या सगळ्या कलांमधून मुक्ती देण्याचा धम्म डॉ. बाबासाहेबांनी दिला. जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती नाही ज्याचा पुतळा हा शासकीय किंवा नेत्यांच्या निधीतून साकारला गेला नाही. परंतु, दोन रुपये वर्गणीतून जमा करून उभारलेला पुतळा हा फक्त डॉ. बाबासाहेबांचाच उभा राहू शकतो. . ज्याने माणसे सजविली, गावे उभारली, विहारे बांधून कुलूप लावण्यासाठी असतील, तर अशी विहारे उभारण्यापेक्षा तोच पैसा उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील मुला-मुलींना उपलब्ध झाला पाहिजे.
मोठ मोठे विचारवंत आपल्या भाषणातून माणुसकीचे, वैचारिकतेचे धडे देतात. अशा विचारवंताला पडताळण्यासाठी बुद्धी कसोटीवर तपासून पहाणे गरजेचे आहे. नतमस्तक होताना कुणापुढे होत आहोत व त्याचे पडसाद आमच्यावर काय उमटतील, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. आपल्यातला माणूस आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आम्हाला बुद्ध दिसत नाही. बाबासाहेबांना जिवंत ठेवायचे असेल तर माणसे जुळवा. वर्णवाद्यांनी महापुरुषांना जातीजातीत विभाजित करून टाकले आहे. महापुरुष हे देशाचे गौरव आहेत. त्यामुळे महात्मा फुलेंसारख्या महापुरुषाचे पुतळेठराविक वस्तीत न दिसता बहुजनांच्या वस्तीत उभारले गेले पाहिजेत.