संत साहित्य म्हणजे भाबडेपणा किंवा अंधश्रद्धा नाही. मनुष्य करीत असलेल्या कर्माचे रूपांतर कर्मकांडात होऊ नये, यासाठी लक्ष्मणरेषा आखण्याचे काम संत करतात. विज्ञान आणि धर्माची सांगड घालताना जीवनाला उपयोगी पडेल त्याच्यातच देवत्व शोधले पाहिजे, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण यांनी केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘संत साहित्य व अंधश्रद्धा’ या विषयावर डॉ. पठाण बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी विश्वस्त राजेंद्र विखे, संचालक आणि पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अप्पासाहेब दिघे, के. पी. आहेर आदी यावेळी उपस्थित होते.डॉ. पठाण म्हणाले, पाश्चिमात्य देशांनी जेव्हा प्रगतीही केली नव्हती, तेव्हा भारताने एैहिक जीवनात प्रवेश केला. भारत हा अध्यात्मप्रवृत्त देश असल्याने संत साहित्याबद्दल अनेक अंगाने विचार करावा लागेल. संत साहित्य हे लौकिक विचार करून थांबले नाही, तर माणसावर संस्कार होण्यासाठी या साहित्याचा उपयोग होतो. माणसाजवळ बुद्धी आहे म्हणून त्याने विज्ञान निर्माण केले, जीवन जगताना माणूस चांगले आणि वाईट असे दोन्ही कर्म करतो. मात्र, त्याला लक्ष्मणरेषा आखण्याचे काम हे संत करीत असून, संतांचे विचार अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारे आहेत असे म्हणणे दुर्दैवी आहे. संत साहित्य म्हणजे भाबडेपणा किंवा अंधश्रद्धा असे समीकरण अकारण पसरविले जात असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.संतांनी सर्वाच्या बुद्धीचा विचार करुन प्रबोधन करण्याचे काम केले. विवेकाचा विचार दिला. पण बहुतेक वेळा समाज हा अंधश्रद्धेभोवतीच फिरताना दिसतो. रेडय़ाच्या मुखातून वेद, िभत चालवणे आदी संतांनी केलेल्या चमत्काराकडे दृष्टांत म्हणून पहावे. नामस्मरण म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन असून संत साहित्याचा अभ्यास करताना त्याचा मतितार्थ जाणून घेतला, तर लौकिक जीवन चांगले जगता येईल, असे पठाण म्हणाले. शेवटी पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी. यू. खर्डे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उद्या (बुधवार) विचारवंत डॉ. भालचंद्र कांगो यांचे ‘एफडीआयचा कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.