आजचा तरुण मल्लविद्येपासून दूर चालला आहे. लाल मातीतील कुस्ती प्रकाराला प्रोत्साहन दिले तरच मल्लविद्या जिवंत राहू शकेल, असे प्रतिपादन हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांनी केले.विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी (पुणे) व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद (पुणे) यांच्या वतीने लातूर तालुक्यातील रामेश्वर (रुई) येथे एकनाथमहाराज षष्ठीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती महाराष्ट्र-मराठवाडा कुस्ती महावीर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी खंचनाळे बोलत होते. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर व दीनानाथसिंग, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, कुस्ती संघटक नंदकुमार विभुते, नागनाथ देशमुख, नसरुद्दीन नाईकवाडे, बंकट यादव, माईर्स एमआयटीचे प्रमुख प्रा. विश्वनाथ कराड, तुळशीराम कराड, काशीराम कराड, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विलास कथुरे, रमेशअप्पा कराड, प्रा. मंगेश कराड आदी उपस्थित होते.राजर्षी शाहूमहाराजांनी कुस्तीला कोल्हापुरात दिले, तसेच प्रोत्साहन मराठवाडय़ातील मल्लांना कराड यांनी दिले. दुष्काळ असला, तरी मर्यादित स्वरूपात तरी कुस्ती परंपरेचे जतन केले जात आहे, असे खंचनाळे म्हणाले. समाज विनाशाच्या कडय़ावर उभा आहे. कारण आपण आपली परंपरा सोडून परकीयांचे अनुकरण करीत आहोत. तरुण पिढी बलाढय़ करायची असेल तर मल्लविद्येशिवाय पर्याय नाही, असे आंदळकर म्हणाले. दीनानाथसिंग, प्रा. विश्वनाथ कराड यांनीही मनोगत व्यक्त केले.खुल्या गटात ज्ञानेश्वर बोचरे व निवृत्ती बिडवे (दोघेही लातूर), तसेच बीडचा विश्वंभर खैरे व उस्मानाबादचा किरण मोरे यांच्यातील कुस्त्या रंगल्या. पहिल्या कुस्तीत ज्ञानेश्वर गोचडे व दुसऱ्या कुस्तीत विश्वंभर खैरे विजयी झाले. प्रास्ताविक रमेश कराड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुधीर राणे, किसन बुचडे यांनी केले. प्रा. राहुल कराड यांनी आभार मानले.