काँग्रेस पक्षाला उद्या, २८ डिसेंबरला १२७ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वचनपूर्ती मेळाव्यासाठी विदर्भातून सुमारे १० हजार कार्यकर्ते रवाना झाले आहेत. काँग्रेसचे शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांनी ही माहिती दिली.
आगामी २०१४ च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका बघता काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेली वचने पूर्ण केली असून त्याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना व्हावी या उद्देशाने हा वचनपूर्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात काँग्रेसची स्थापना झाली होती. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य लढय़ात आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या सर्वागीण विकासासाठी काँग्रेसने भरीव योगदान दिले आहे. काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन १२७ वर्षांचा काळ लोटला असून या काळात काँग्रेसने अनेक चढउतार बघितले आहे. आघाडी सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्ती सुरू असून त्यातील काही निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतले असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.   काँग्रेसच्या विरोधात अपप्रचार केला जात असताना खरी सत्यता जनतेसमोर यावी या दृष्टीने जिल्हाशहा कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले जाणार आहे. मुंबईला आयोजित करण्यात येणाऱ्या वचनपूर्ती मेळाव्यासाठी विदर्भातून १० हजारच्यावर कार्यकर्ते पाठविण्यात आहे. यासाठी विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आली. एफडीआयचा मुद्दा सध्या सर्वत्र गाजत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या विरुद्ध जनजागरण सुरू केले असून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते पुढे येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वचनपूर्ती मेळावा असल्याचे गुप्ता म्हणाले. एक विशेष ट्रेन, बसेस आणि स्वतच्या वाहनांनी पदाधिकारी, आजी माजी मंत्री खासदार ,आमदार  कार्यकर्ते मुंबईला निघाले आहेत.