वेणुनादाने रसिकांचे कान तृप्त करणारे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ बासरीवादक पद्मभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया वास्तविक पहेलवान व्हायचे. पण रसिकांच्या सुदैवाने नियतीच्या मनात वेगळेच होते आणि अद्वितीय असा बासरीवादक घडला..
पहेलवान न होता आपण बासरीवादक कसे झालो, त्याची आठवण दस्तुरखुद्द पं. चौरसिया यांनी शुक्रवारी मुंबईत उलगडली. निमित्त होते सेंट झेविअर्स महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेचे. महाविद्यालयाच्या ‘इंडियन म्युझिक ग्रुप’तर्फे २५ आणि २६ जानेवारी रोजी ‘जॅनफेस्ट’ या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस पं. चौरसिया उपस्थित होते. या वेळी आठवणींना उजाळा देताना पंडितजी म्हणाले की, माझे वडील पहेलवान होते. त्यामुळे मीसुद्धा पहेलवान व्हावे, असे माझ्या वडिलांना वाटायचे. पण माझ्या आईमुळे मी बासरीवादक झालो.
भावुक झालेल्या पं. चौरसिया यांनी सांगितले की, लहानपणी आई मला जेवण भरविताना गाणी गुणगुणायची, मला ‘लोरी’ म्हणवत झोपवायची. आईचे ते शब्द आणि सूर माझ्या मनात-डोक्यात कायम गुणगुणत राहिले. आईने माझे नावही ‘हरी’ ठेवले होते. याच ‘हरी’च्या हातात पुढे आईने बासरी दिली आणि मी पहेलवान न होता बासरीवादक झालो.कोणतेही काम करताना आपले मन आणि जीव त्यात पूर्णपणे ओतून काम करा. ते काम करताना त्यात कोणतीही हयगय, कामचुकारपणा करू नका. कर्तव्यभावनेने काम करा. देवाची आपण जशी भक्ती करतो, तसे तुम्ही करत असलेल्या कामाकडे पाहा, असा सल्लाही पं. चौरसिया यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिला. तुमच्या वेळचे आणि आत्ताचे संगीत यात काय बदल वाटतो, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, असे काही बदलत नसते. सर्व काही आपल्या मनावर आणि भावनेवर अवलंबून असते. त्यामुळे आपले मन बदलते. संगीत कल भी अच्छा था, आज भी अच्छा है और कल भी अच्छा ही रहेगा’