शहरातील विविध भागांतून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मांडसांगवी, आगरटाकळी व जेलरोड परिसरात या घटना घडल्या. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडसांगवी शिवारात राहणारी १३ वर्षीय मुलगी शाळेत निघाली असताना संशयित युवकाने तिला काही तरी आमिष दाखवून पळवून नेले. मुलगी शाळेतून घरी न परतल्याने आईने शोधाशोध सुरू केली. परंतु, ती मिळून आली नाही. अखेर या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दुसरी घटना उपनगर परिसरातील आगरटाकळी येथे घडली. घराजवळ उभ्या असलेल्या १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. सकाळच्या सुमारास ही घटना घडली. घराजवळ उभी असताना संशयित युवकांनी तिला पळवून नेले, असे आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिसरी घटना जेलरोड परिसरात घडली. १६ वर्षीय युवती क्लासला निघाली होती. या वेळी संशयित युवकांनी तिला काही तरी आमिष दाखविले. मोरेमळा भागातील बालाजीनगर येथे हा प्रकार घडला. उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. पण, ती सापडली नाही. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन युवतींना फूस लावून पळवून नेण्याच्या एकाच वेळी तीन घटना घडल्याने पालक वर्गात अस्वस्थता पसरली आहे. मागील महिन्यात शहरातून बालकांच्या अपहरणाच्या अनेक घटना घडल्या होत्या. आता अल्पवयीन मुलींना फूस लावण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसत आहे. अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून फसविण्याचे याआधी अनेक प्रकार घडले आहेत. शालेय वा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबाबत हे प्रकार अधिक असल्याचे दाखल होणाऱ्या गुन्ह्य़ांवरून लक्षात येते.