मुंबईच्या ३४ किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने योजना तयार केली आहे. मुंबई महापालिकेने त्यास मंजुरी दिली तर रात्रीचा बाजार (नाइट लाइफ नव्हे) आणि कलाग्रामसारखे प्रकल्प या किनाऱ्यावर उभे राहतील तसेच सागरी आणि साहसी क्रीडाप्रकारांचा अनुभव पर्यटकांबरोबरच मुंबईकरांनाही घेता येईल. मुंबईचा पूर्व किनारा संरक्षणदलाच्या अखत्यारीत आहे. पश्चिम किनाऱ्यावर पर्यटकांसाठी खास आकर्षण तयार करण्यासाठी पर्यटन महामंडळाने योजना आखली आहे. हाजीअली, वरळी सीफेस आणि मरिन लाइन्स येथे पर्यटकांसाठी माहिती केंद्र सुरू करण्यात येणार आहे.  हाजीअली येथे रेसकोर्सच्या बाजूला मुख्य रस्त्याकडील फुटपाथवर कलाग्राम उभारण्यात येणार आहे. १२ मीटर रुंद आणि दीड किमी लांब अशा खास पदपथाची उभारणी करून त्यावर हे कलाग्राम वसविण्यात येणार आहे. या कलाग्राममध्ये मुंबईच्या संस्कृतीची तसेच येथील कलाजीवनाची ओळख करून देण्यात येईल. तसेच ‘नाइट बाजार’ही येथे सुरू करण्यात येणार आहे.