जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांच्या समस्या, रिझव्र्ह बँकेने नागरी सहकारी बँकांसाठी लावलेले निकष, नवीन आदर्श उपविधी या सर्वाविषयी दि नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करण्यात आले.येथील समर्थ मंगल कार्यालयात नानासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. प्रारंभी सभासद बँकांच्या प्रतिनिधींचे स्वागत असोसिएशनचे व्यवस्थापक रामलाल सानप यांनी केले. सोनवणे यांनी जिल्ह्यातील सभासद नागरी सहकारी बँकांना येणाऱ्या अडीअडचणी, समस्या सोडविण्यासाठी व सहकारी बँकींग चळवळीची निकोप वाढ व्हावी यासाठी असोसिएशन प्रभावीपणे काम करत असल्याचे सांगितले. सध्या नागरी सहकारी बँकांची वाटचाल संक्रमण अवस्थेत असून जागतिकीकरण व मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाल्याने सहकारी बँकींग क्षेत्रापुढे इतर बँकांचे एक नवे आव्हान उभे आहे. ते पेलण्यासाठी आपण सदैव सतर्क राहून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, सर्वोत्तम व दर्जेदार ग्राहक सेवा तसेच बँकांचे संचालक, अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण या प्रमुख गोष्टींकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत असोसिएशनच्या माध्यमातून प्रशिक्षण व विविध योजनांची आखणी करण्यात येत आहे. जिल्ह्य़ातील सर्व नागरी सहकारी बँकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी असोसिएशन नेहमीच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे उपाध्यक्ष व असोसिएशनचे संचालक अजय ब्रrोचा यांनी नागरी सहकारी बँकांचे विविध प्रश्न तसेच बँकींगमध्ये येणाऱ्या अडचणी, तसेच रिझव्र्ह बँकेने नागरी सहकरी बँकांना लावलेले निकष व नवीन आदर्श उपविधी या विषयांवर मार्गदर्शन केले. सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. तसेच ठेवींवरील विमा संरक्षण वाढविणे, ब वर्ग सभासद मर्यादा वाढविणे, सहकारी बँकांना लागू केलेला आयकर रद्द करणे या महत्वपूर्ण प्रश्नांवर असोसिएशन व फेडरेशनमार्फत पाठपुरावा करून विविध प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल असे नमूद करण्यात आले. यावेळी २०१३-१४ या आर्थिक वर्षांच्या व्यवस्थापक मंडळाने तयार केलेला ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, अंदाजपत्रक व लेखापरीक्षण अहवालास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.