गाव पातळीवरील दाखल असणारे व नव्याने निर्माण होणारे तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत उत्तम कामगिरी नोंदविण्याचा गांभीर्याने विचार होत नसल्याचे दिसते. या मोहिमेतील अंतीम मूल्यमापनात १९० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना शांतता पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्या अंतर्गत जादा निधी उपरोक्त गावांना प्राप्त होतो. मोहिमेतील तिसऱ्या वर्षांचा अपवाद वगळता अन्य वर्षांत हा पुरस्कार मिळविणाऱ्या गावांची संख्या कमी राहिल्याचे दिसते.
या मोहिमेत तंटामुक्त गांव जाहीर करण्यासाठी शासनाने काही विशिष्ट निकष निश्चित केले आहेत. त्या अंतर्गत तंटामुक्त गाव पात्रतेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, दाखल तंटे मिटविणे व नव्याने होणारे तंटे मिटविणे यासाठी एकत्रित १५० गुणांची आवश्यकता असते. बाह्य मूल्यमापनात पात्र ठरलेल्या गावांना तंटामुक्त गांव म्हणून जाहीर केले जाते. या मूल्यमापन प्रक्रियेत ज्या गावांनी १९० हून अधिक गुण प्राप्त केले, त्यांची शांतता पुरस्कारासाठी निवड केली जाते. या गावांना मिळणाऱ्या पुरस्काराशिवाय मिळालेल्या पुरस्कार रकमेच्या २५ टक्के इतकी रक्कम विशिष्ट सन्मानचिन्हासह शांतता पुरस्कार म्हणून दिली जाते. मोहिमेच्या प्रारंभीच्या पाच वर्षांचा आढावा घेतल्यास या काळात राज्यातील १,२२३ गावांची शांतता पुरस्कारासाठी निवड झाली होती. ज्या वर्षी या मोहिमेचा शुभारंभ झाला, त्या २००७-०८ या पहिल्या वर्षांत २५२ गावांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्यापुढील २००८-०९ या वर्षांत २६५ गावे, २००९-१० या कालावधीत हा पुरस्कार मिळविणाऱ्या गावांची संख्या सर्वाधिक म्हणजे ३६० इतकी होती. २०१०-११ मध्ये राज्यातील २७१ गावांनी शांतता पुरस्कार मिळविला.
मोहिमेच्या पाचव्या अर्थात २०११-१२ या वर्षांत गावांची संख्या सर्वात कमी म्हणजे केवळ ७५ गावांवर आली आहे. या माध्यमातून उपरोक्त गावांना स्थायी स्वरूपाची विकासकामे करण्यासाठी पारितोषिकांच्या माध्यमातून जादा निधी प्राप्त झाला.