संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात वाई पंचायत समितीला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि ग्राम विकास व जलसंधारण विभागातर्फे आयोजित संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. रुपये चार लाख व स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, पंचायत समितीच्या सभापती मनीषा शिंदे, उपसभापती शंकरराव शिंदे, सदस्य व गटविकास अधिकारी संजीव गायकवाड आदींनी हा पुरस्कार स्वीकारला.आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील सहा वर्षांपासून नियोजित पद्धतीने विकास कामे करून आजी माजी सदस्य, अधिकारी आदींनी समन्वय करून पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.वाई पंचायत समितीने बायोगॅस, निर्मल ग्राम, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, सौरदीप, कृषी विभागाच्या विविध योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कुटुंब कल्याण, लेक वाचवा अभियान, पाझर तलाव व जिल्हा परिषदेच्या योजना प्रभावी पद्धतीने राबविल्यामुळेच हा पुरस्कार मिळाल्याचे सभापती मनीषा प्रमोद शिंदे यांनी सांगितले. या बद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.