तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसून तालुक्यातील शिरापूर येथे गुरूवारी सकाळी सोमनाथ हरीभाऊ गुळवे या २४ वर्षीय शेतकरी तरूणाचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच या तरूणाला आपल्या प्राणास मुकावे लागल्याचा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला आहे.
शिरापूर परिसरात दिवसाही भारनियमन सुरू आहे. सोमनाथ हा बुधवारी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. रात्रभर पाणी भरल्यानंतर गुरूवारी पहाटे हे काम थांबविण्याच्या तयारीत असताना शेतावरून जाणारी विजेची लोंबलेली तार सोमनाथच्या मानेस चिकटली. या तारेतून विजप्रवाह वाहत असल्याने तसेच शेतात पाणी असल्याने या विजेचा सोमनाथ या जोरदार धक्का बसून तो तेथेच कोसळला.
पारनेर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शिरापूर परीसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या अवस्थेत असून त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी यापूर्वी अनेकदा नागरीकांनी महावितरणकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने या तरूणास आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकर उचाळे यांनी केला आहे.