रस्त्यात उभ्या असलेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बसल्याने तिघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पंचवीसचार (ता. माळशिरस) येथे हा अपघात घडल्याची अकलूज पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
रोहित दशरथ गोरे (वय १७, रा. एकतपूर, ता. सांगोला), बाबुराव आगंद आरेकर (वय २४, रा. भूम, जि. उस्मानाबाद) व दीपक शिवाजी पवार (वय ३०, रा. नातेपुते, ता. माळशिरस) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेही नातेपुते येथील एका फर्निचरच्या दुकानात नोकरीस होते. गुरुवारी सायंकाळी ते माळीनगर येथील फेस्टिव्हल पाहण्यासाठी गेले होते व त्यानंतर जेवणासाठी टेंभुर्णीला गेले होते. परतत असताना पंचवीसचार या ठिकाणी रस्त्यात उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकल्याने ते जागीच ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.