मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळातील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी स्थापन ‘आस्था सेल’ने दोन वर्षांत एकूण ३१ हजार २०२ प्रकरणांचा निवारण केले असून शिल्लक २१ प्रकरणांसंबंधी मुख्यालयात पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाचे व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांच्या पुढाकाराने या ‘आस्था सेल’ची स्थापना करण्यात आली होती. अप्पर मंडळ व्यवस्थापक जयदीप गुप्ता यांच्याकडे ‘आस्था सेल’ची जबाबदारी सोपविण्यात आली. नागपूर मंडळांतर्गत विविध रेल्वे स्थानकांवर पाचवेळा संपर्क शिबिरे आयोजित करण्यात आली होती. वर्तमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारी एका संगणकात तारीखवार नोंदविण्यात येतात. त्यानंतर त्याची पावती दिली जाते. या तक्रारींवर कुठली कार्यवाही झाली, हे संबंधित कर्मचाऱ्याला कुठेही आणि कुठल्याही संगणकावर पाहता येते. त्यासाठी युनिक आय.डी. क्रमांक देण्यात येतो.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दोन तासात पास उपलब्ध करून दिला जातो. तक्रारींसाठी ०१२-५५०३२ हा रेल्वे तसेच ०७१२-२५४८१८३ हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय ९५०३०१२६०७ या भ्रमणध्वनी क्रमांकावरही संपर्क साधता येतो. निर्धारित कालावधीत तक्रारींचे निवारण न झाल्यास वरिष्ठ प्रशासन (कार्मिक) अधिकाऱ्याकडे संपर्क साधता येतो. कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे लवकरात लवकर निवारण करण्याचा ‘आस्था सेल’चा प्रयत्न असल्याचे प्रवीण पाटील यांनी सांगितले