राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टी यांच्यावर बेलगाम आरोप करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी निषेध केला. त्यांचा बोलविता धनी वेगळाच असून त्यांच्याप्रति निष्ठा दाखवण्यासाठी शिंदे अशी बेताल वक्तव्ये करत असल्याची टिका गांधी यांनी केली आहे.
आरएसएस व भाजप यांनी सांस्कृतिक चळवळींबरोबरच देश मजबूतीसाठी मोठे योगदान दिले आहे. जनकल्याण हेच भाजपचे ध्येय आहे. अन्य कोणतीही संघटना किंवा राजकीय पक्ष आरएसएस किंवा भाजपसारखे ध्येयनिष्ठ व देशासाठी समर्पणाची भावना असणारे कार्यकर्ते तयार करू शकत नाही. रचनात्मक कार्य उभे करण्याचा राष्ट्रीयत्वाचा संस्कार देशातील हेच दोन पक्ष कार्यकर्त्यांना देत असतात.
त्यांच्यावर दहशतवादाचा आरोप करणारे केंद्रीय गृहमंत्री शिंदे अत्यंत बेजबाबदार मंत्री आहेत. अशीच बेताल वक्तव्ये वारंवार करून आपला बेजबाबदारपणा ते सिद्ध करत आहेत अशी टिका गांधी यांनी केली आहे.