निवडणुकीदरम्यान काँग्रेसने दिलेली आश्वासने कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जातील, असा विश्वास उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनी महापौर-उपमहापौर निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जन्म-मृत्यू दाखल्यासाठी सांगलीकरांकडून वसूल केली जाणारी फी उद्यापासून रद्द केली जाणार असून, अवघ्या पाच रुपयांत हा दाखल आता मिळणार असल्याची घोषणाही पाटील यांनी या वेळी केली.
सांगलीच्या जनतेला स्वच्छ पाणी देण्यासाठी काँग्रेसने वारणा-उद्भवची योजना आखली होती. तीच योजना नजीकच्या काळात पूर्ण करून स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याचा निर्धार आम्ही केला आहे असे सांगून मदन पाटील म्हणाले, की शेरीनाल्याचा प्रश्नही तातडीने हाती घेण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. महापालिकेकडे निधीची उपलब्धता कमी असली तरी केंद्र व राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून विकासकामाला गती दिली जाईल. शहरातील रस्ते खड्डेविरहित करण्यास प्राधान्य देण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले.