आर्थिक विवंचना ही कुटुंबाची मोठी समस्या आहे. त्यातूनच बालकामगार निर्माण होतात, असे मत स्वारातिम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त  केले.
‘बालकामगार व मानवी हक्क’ या विषयावर दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य सर्जेराव शिंदे, सूर्यकांत कुलकर्णी, डॉ. बाबाराव कऱ्हाडे, डॉ. दीपक कारभारी, डॉ. एस. पी. गायकवाड, रमेश बियाणी उपस्थित होते.
डॉ. निमसे म्हणाले की, मानवी हक्काच्या संरक्षणाची हमी कल्याणकारी राज्यात दिलेली असते. मनुष्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची जबाबदारीही सरकारचीच असते. अन्न, वस्त्र, निवारा या मुख्य गरजांबरोबरच शिक्षण मिळत नाही व उच्च शिक्षण प्राप्तीनंतर रोजगाराची हमीच मिळत नसल्यामुळे बालकामगार निर्माण होतात. बालहक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगाचे राज्य प्रतिनिधी सूर्यकांत कुलकर्णी यांनी बालकामगार व बालगुन्हेगारी थांबवण्यासाठी केवळ कायदे करून चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. देशातील ९१ टक्के बालकामगारांना शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. राज्यातील ऊसतोड कामगारांचे ४ लाख बालकामगार आहेत. एकूणच या समस्यांचा मुळापासून विचार करण्याची गरज आहे. बालकामगार थांबवण्यासाठी कुटुंबापासून विचार करण्याची गरज रमेश बियाणी यांनी व्यक्त केली.