ती वृक्ष होऊन उन्मळली
तो म्हणाला
पानांची सळसळ
ऐकू येत नाही
फुलांना पायदळी तुडवताना
काटय़ांना किती जपावं लागतं
तुम्हाला काय माहीत..
अशा आशयघन संपन्न काव्य पंक्तींव्दारे कवयित्री शारदा गायकवाड यांनी उपस्थितांना अंतर्मूख केले. निमित्त होते येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित ‘कवितेवर बोलू काही’ या मैफलीचे. मनुष्याचे आयुष्य हे फार मर्यादित असते. त्यातही तारुण्य कधी संपत ते कळत नाही. मग केवळ जन्माला येऊन व्यर्थ मरण्यापेक्षा काहीतरी सामाजिक कार्य करून भगवंताचे ऋण फेडावे यासाठी गायकवाड यांनी ‘शारदा बहुउद्देशीय संस्था’ स्थापन केली.
आपल्या कर्तृत्वाने  मागे उरावे या पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे त्या जीवन जगत आहेत. कविता आणि कविचे जगणं यात अंतर नसावे. कविता लिहिण्यापेक्षा ती प्रत्यक्षात जगणं जास्त महत्वाचे असते, असे त्यांचे म्हणणे आहे.
वाचनालयाचे सहसचिव कवी विवेक उगलमुगले आणि कवयित्री जयश्री वाघ यांनी गायकवाड यांची मुलाखत घेतली. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने, वाचनालयाचे सचिव हेमंत पोतदार, सवरेत्कृष्ट वाचक पुरस्काराचे मानकरी डॉ. भूषण कुलकर्णी, ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे आदी मान्यवरांच्या हस्ते    दीपप्रज्वलन   करण्यात    आले.   ‘ती’ला कवितेतून शोधताना या उपशीर्षकाखालील कार्यक्रमात कवयित्री शारदा गायकवाड यांचा बालपणापासून ते आतापर्यंतचा   प्रवास विविध प्रश्नांव्दारे जाणून घेण्यात आला.
कवितेने आयुष्य समृद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. महामिने यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कवयित्री निशिगंधा घाणेकर यांनी गायकवाड यांच्या कविता आणि त्यांचं व्यक्तिमत्व याबाबत मनोगत व्यक्त केले.