भारतातील प्रत्येक कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आपणच तिला मुलगीच असल्याची जाणीव करून देतो आणि तिचे अस्तित्व निर्माण करण्याची व सामाजिक, शैक्षणिक, बौध्दिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय क्षेत्रातील प्रगती रोखण्याचा सकस प्रयत्न आपल्या रुढी व परंपरेच्या माध्यमातून करत असतो. त्यामुळे भारतीय मुलींना स्त्रियांच्या समस्या जाणून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न समाजाच्या सर्व स्तरातून व्हायला पाहिजे, असे विचार प्रा. रेखा मेश्राम यांनी व्यक्त केले.  
 चौथ्या बहुजन साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या ‘भारतीय स्त्री मुक्तीची समस्या आणि उपाय’ या पहिल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून मांडले. यावेळी मंचावर डॉ.अरुण लोखंडे, सुनील कुमरे, संगीता धोटे यांनीही परिसंवादाच्या विषयाला अनुसरून स्त्री मुक्तीचे वेगवेगळे उपाय सांगून विचार मांडले. स्त्रीविषयक परिसंवादाची भूमिका प्रा.डॉ.अनिता वाळके यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व मार्मिक शब्दात मांडली. परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा.मृणाल रायपुरे यांनी केले, तर आभार प्रा.दिलीप रामटेके यांनी मानले.
दुसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार, सत्यवाणीचे शिल्पकार व समाजप्रबोधनकार संदीप पाल महाराज यांचे जनप्रबोधनपर जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमात सादर करून साहित्य रसिकांना मनोरंजनातून थोर महात्मांच्या विचारांचा कीर्तनाचा कार्यक्रम सादर केला. संमेलनाच्या पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात झाडीपट्टीतील कलावंत महेंद्र गोंडाणे यांनी सलग दीड तास साहित्य रसिकांना खिळवत ठेवत जिजाऊ, शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या मौलिक विचारांची भाकर आपल्या ‘भाकर’ नावाच्या एकपात्री प्रयोगातून प्रबोधन केले, तर सायंकाळच्या सत्रात ज्ञानेश वाकूडकर यांच्या ‘अंगार आणि शृंगार’ या विचारांना प्रेरणा देणारा कार्यक्रम सादर करून मंत्रमुग्ध केले.